नाशिक : उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेनंतर महाराष्ट्रात पवार काका – पुतण्याच्या राजकीय ऐक्याची चर्चा सुरू झाली. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या दोघांनी त्या चर्चेला भावनिक खतपाणी घातले. सुप्रिया सुळे यांनी नाती जपण्याविषयी पत्रकारांना “व्याख्यान” दिले. रोहित पवारांनी नेहमीप्रमाणे सोशल मीडिया पोस्ट लिहिली.
पण ज्याप्रमाणे ठाकरे बंधू एकमेकांशी मतभेद झाल्यानंतर प्रामाणिकपणे एकमेकांपासून दूर झाले, तसेच पवार – काका पुतण्यांचे कधीच झाले नव्हते, नाही आणि होण्याची शक्यताही नाही. उलट अगदी अजित पवारांनी शरद पवारांपासून दूर होऊन 2023 मध्ये महायुतीत प्रवेश केला, त्यावेळी देखील बारामतीचे पवारांच्या जवळचे एक नेते चंद्रराव तावरे यांनी त्यासंबंधीचा खुलासा केलास होता पवार काका – पुतणे मुळात वेगळे झालेलेच नाहीत. जे काही वेगळे झाल्याचे दिसते ते वरवरचे आहे. ते नाटक आहे, असे चंद्रराव तावरे त्यावेळी म्हणाले होते. त्यावेळी त्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविले होत्या, पण अजितदादांच्या महायुतीतल्या प्रवेशाच्या बातम्यांच्या गदारोळात चंद्रराव तावरेंनी केलेल्या वक्तव्याकडे दुर्लक्ष झाले होते.
त्यामुळे पवार काका – पुतणे हे एकमेकांपासून दूर झालेत आणि त्यात प्रामाणिकता आहे हे मानणेच मुळात चूक आहे. कारण पवार काका – पुतण्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे की त्यांना सत्तेच्या वळचणीशिवाय राहताच येत नाही. त्यामुळे आपापसात मतभेद झाल्याचे दाखवून अजित पवार शरद पवारांपासून दूर झाले आणि त्यांनी अलगदपणे भाजपच्या सत्तेची वळचण पकडली. हे करताना त्यांनी आपल्या शिक्षण संस्था साखर कारखाने इतर सहकारी संस्थांचे “राजकीय हितच” जपले, या संस्थांना कायद्याच्या कचाट्यातून सोडविण्याचे प्रयत्न केले, जे स्वतः शरद पवारांना हवे होते. म्हणूनच सहकारी संस्थांपासून ते शिक्षण संस्थांपर्यंत पवारांचे वर्चस्व जसेच्या तसे टिकून राहू शकले. अन्यथा महायुती मधल्या भाजपने ते टप्प्याटप्प्याने संपुष्टात आणले असते. पवारांच्या कौटुंबिक राजकारणाला कायमचा धक्का लागला असता. या सगळ्याची जाणीव शरद पवारांना झाल्यानंतरच पवारांनी अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाण्याची “मोकळीक” दिली.
भले सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आज भावनिकतेच्या मुद्द्यावर नाती जपण्याची भाषा करत असले, तरी प्रत्यक्षात पवारांची नाती ही मूळात भावनिकतेपेक्षा “राजकीय व्यवहारावर” आधारित आहेत. ती आजही जशीच्या तशी “इंटॅक्ट” आहेत. त्याला भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी अजून तरी कुठेही धक्का लावलेला नाही. म्हणूनच पवार काका – पुतणे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये, पुण्यातल्या साखर संकुलात किंवा साताऱ्यातल्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत एकत्र दिसतात, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण पवार काका – पुतण्यांचे राजकीय प्राणच या संस्थांच्या पोपटांमध्ये अस्तित्वात आहेत. भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी ते पोपट अद्याप जिवंत ठेवलेत.
त्या उलट ठाकरे बंधूंनी असले कुठलाही संस्थात्मक हितसंबंधांचे राजकारण उभेच केले नाही. त्यामुळे असल्या राजकारणाचे ओझे बाळगायचे कारण नाही. म्हणून ठाकरेंच्या घरात मतभेद झाले, त्यावेळी ते खरंच प्रामाणिकपणे एकमेकांपासून दूर झाले आणि त्यांनी एकमेकांशी वैर धरले होते. आता ज्यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंच्या राजकीय पक्षांचे अस्तित्व खऱ्या अर्थाने धोक्यात आले आहे, त्यावेळी त्यांना राजकीय ऐक्याची गरज भासू लागली आहे, म्हणूनच त्यांनी एकमेकांना व्हॅलेंटाईनचे गुलाब देण्यासाठी हात पुढे केले आहेत, पण त्या गुलाबांचे काटे फारच मोठे झालेले दिसत आहेत.
Pawar uncle nephew United from inside, for their political interests
महत्वाच्या बातम्या