पोरं टोरं पण देऊ लागली “आवाज”; नगरपंचायती टिकवायला भाजपच्या कुबड्यांना लागतोय दुसऱ्या कुबड्यांचा आधार!!, ही अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय अवस्था येऊन ठेपली आहे.
पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांवर केलेले सत्तेचे संस्कार एवढे “उच्च दर्जाचे” आहेत की सत्ता हातातून जातेय हे पाहिल्याबरोबर त्यांची मस्ती उफाळून येते आणि ते आपल्या जुन्या मालकांनाच शिव्या देऊ लागतात. याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आला.
– राजन पाटलांच्या मुलाची मस्ती
सगळे राजकीय आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काढलेल्या राजन पाटलांना सत्ता टिकवण्यासाठी भाजपमध्ये जावे लागले. पण तिथे गेल्यानंतर सुद्धा त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबावरचे मूळचे “पवार संस्कार” संपुष्टात आले नाहीत. त्यांची मूळ मस्ती कायम राहिली म्हणूनच अनगर मधून विरोधी महिला उमेदवाराने नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करताच राजन पाटील आणि त्यांच्या मुलांचे पित्त खवळले. बाळराजे पाटलाने थेट अजित पवारांना बोट दाखवून अरे तुरेची भाषा करत आव्हान दिले. बाकी कुणाच्याही नादी लाग, पण अनगरकर पाटलाच्या नादी लागू नको, अशी दमबाजी बाळराजे पाटलांनी अजितदादांना केली. एरवी अजित पवारांना अशा कुठल्याही पोरा टोराने आव्हान दिले नव्हते. ते राजन पाटलांच्या मुलाने दिले. त्यामुळे बोल भिडू youtube चॅनेलने त्याचे वर्णन लेकरू म्हणून खांद्यावर घेतले आणि कानात मु***, अशा शेलक्या शब्दांमध्ये केले.
राजन पाटलांनी अजित पवारांची आणि शरद पवारांची माफी मागून प्रकरणावर पडदा टाकायचा प्रयत्न केला पण तेवढ्यात त्यांनी पार्थ पवारचे नाव घेऊन अजितदादांच्या राजकीय जखमेवर मीठ पण चोळले. तुम्हाला बोलून बाळराजे चुकला पण तुम्ही जसे पार्थला सांभाळून घेतले तसेच बाळराजेला संभाळून घ्या असे आवाहन राजन पाटलांनी केले. पण म्हणून अजितदादांसारख्या मातब्बर नेत्याला सोलापूर जिल्ह्यातल्या एका पोराने आव्हान दिले हे राजकीय सत्य मात्र लपून राहिले नाही. भाजपा बरोबर सत्तेच्या वळचणी आलेल्या अजितदादांची अशी अवस्था झाली.
– बारामती + माळेगाव मध्ये तडजोड लागली करावी
पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीची आणि खुद्द अजितदारांची आणखी राजकीय केविलवाणी अवस्था झाली, ती बारामती आणि माळेगाव नगरपंचायतींची सत्ता टिकवताना. बारामती आणि माळेगाव नगरपंचायतींमध्ये पवारांची “दादागिरी” कायम चालली. तिथल्या नगरपंचायतींच्या, बँकांच्या, सहकारी संस्थांच्या निवडणुका कधी होऊन जायच्या हे बाहेर कळायचे सुद्धा नाही, एवढी पवार काका पुतण्यांची एकहाती सत्ता तिथे होती.
– बारामतीत पवारांची महाविकास आघाडी
पण आता बारामती आणि माळेगाव नगरपंचायतींची सत्ता टिकवताना पवार काका – पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींना आपल्या जुन्या राजकीय वैऱ्यांशी जुळवून घ्यावे लागले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बारामतीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्याबरोबर जागावाटप करावे लागले, तर अजित पवारांच्या शिवसेनेला भाजपबरोबर जुळवून घेताना नाकीनऊ आले. बारामती नगरपंचायतीत भाजपने स्वतंत्र पॅनल उभे करायचे ते केलेच. शिवाय नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा एडवोकेट गोविंद देवकातेंसारखा तगडा उमेदवार दिला.
– माळेगाव मध्ये रंजनकाकांशी आघाडी
माळेगाव मध्ये अजित पवारांनी साखर कारखान्याचे निवडणुकीत तावरे यांच्या पॅनलचा पराभव केला, पण त्याच रंजन काका तावरेंशी अजित दादांना माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत जुळवून घ्यावे लागले. रंजन काका तावरेंच्या पॅनलला नगरपंचायतींच्या 6 जागा तडजोडी मध्ये सोडाव्या लागल्या. कारण माळेगाव मध्ये शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांची आघाडी करून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात तगडे उमेदवार उभे केले. त्यामुळे माळेगावची लढत काका विरुद्ध पुतण्या अशी रंगली, पण दोघांनाही राजकीय कुबड्यांचा आधार घ्यावा लागला.
– अमित शाहांनी हिणवले
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांना राजकीय कुबड्या म्हणून हिणवले होते. त्या कुबड्या भाजपने फेकून द्याव्यात, असे आक्रमक वक्तव्य केले होते. पण भाजपने घेतलेल्या त्याच कुबड्यांना बारामती आणि माळेगाव सारख्या आपल्या गावात सत्ता टिकवण्यासाठी वेगळ्या छोट्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागला. भाजपच्या सत्तेच्या वळचळणीची ही “राजकीय कमाल” सगळ्या महाराष्ट्राला दिसली.
Pawar uncle – nephew had to compromise with their own opposition in Baramati and Malegaon
महत्वाच्या बातम्या
- मोठा दिलासा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’
- Nitish Kumar : नितीश कुमार 20 नोव्हेंबरला गांधी मैदानावर शपथ घेणार; BJP आणि JDU मध्ये प्रत्येकी 16 मंत्री
- येवल्यात भुजबळांशी युती, बारामतीत अजितदादांशी फाईट; भाजपने केली राष्ट्रवादीची हवा टाईट!!