विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर – पॅकेज म्हणा की आणखी काही. पण लोकांना मदत जाहीर करा. एनडीआरएफचे निकष २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बदललेत. त्यानुसार लोकांना तातडीने मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूरात केली. पूरग्रस्त भागाच्या पहाणी दौऱ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. package or something but give people immediate help; Devendra Fadnavis’s demand to Thackeray-Pawar government
फडणवीस म्हणाले, की शेतकऱ्यांना सवलतीचे कर्ज दिले पाहिजे, अशी मागणी अनेक घटकांनी केली आहे. याचाही विचार राज्य सरकारने केला पाहिजे. आमच्या काळात तीन पट नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली होती. समित्या अनेक तयार होतात. पण त्याच्या अहवालांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. माझी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट झाली, तेव्हा मी त्यांना दोन विनंती केल्या. १) पूरग्रस्तांना तातडीची मदत करा २) दीर्घकालीन तोडग्यासाठी मुंबईत बैठक घ्या! यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा दादा पाटील आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :
- पूरग्रस्तांना राज्य सरकारची अजूनही मदत आलेली नाही. अनेक घरांमध्ये चिखल आहे. घरात साधे मीठ सुद्धा नसते. त्यामुळे आज तातडीची मदत ही महत्वाची असते. मदतीला उशीर होतो आहे. सरकारने तातडीने मदत करावी.
- सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील २२ ठिकाणी भेटी दिल्या, नागरिकांशी संवाद साधला. शेती आणि पिकांचे नुकसान मोठे आहे.
- कोल्हापूरचा बास्केट ब्रीजच्या कामाच्या बाबतीत दिरंगाई होते आहे. हे काम लवकर झाल्यास दळणवळणाचा प्रश्न राहणार नाही. २२ पुलांचा एक आराखडा सुद्धा तयार केला होता, त्याची अंमलबजावणी व्हावी.
- दीर्घकालीन उपाययोजना करण्याची सुद्धा गरज आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेवर आम्ही काम केले. जागतिक बँकेने त्यासाठी कर्ज मंजूर केले. यातून दुष्काळी भागाचा प्रश्न मिटेल, पुराचेही प्रश्न मिटतील. यासाठी एका बैठकीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यांना सविस्तर निवेदन देणार आहे आणि मुख्यमंत्री बोलवतील, तेव्हा बैठकीला जाऊ. पॅकेज म्हणा की आणखी काही. पण लोकांना मदत जाहीर करा. एनडीआरएफचे निकष २०१५ मध्ये मा. मोदीजी यांनीच बदलले.
- पूरग्रस्त शेतकऱ्यांना सवलतीचे कर्ज दिले पाहिजे, अशी मागणी अनेक घटकांनी केली. याचाही विचार राज्य सरकारने केला पाहिजे. आमच्या काळात तीन पट नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली होती. समित्या अनेक तयार होतात. पण त्याच्या अहवालांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
अतिवृष्टीचे भयानक रूप
कोल्हापूर :
- २००५ पुरात २१ दिवसात १५९% पाऊस
- २०१९ पुरात ९ दिवसात ४८०% पाऊस
- २०२१ पुरात ५ दिवसात ५०% पाऊस
सांगली
- २००५ पुरात २१ दिवसात २१७% पाऊस
- २०१९ पुरात ९ दिवसात ७५८% पाऊस
- २०२१ पुरात २ महिन्यात ५०% पाऊस