प्रतिनिधी
मुंबई : निवृत्ती नाट्य घडवून खुंटा हलवून बळकट केल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीतल्या भाकऱ्या फिरवायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी संघटनात्मक निवडणुका घेण्याची सूचना केली असून, त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे. NCP to change its maharashtra regional president and Mumbai president
शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत संघटनात्मक निवडणुका घेण्याची सूचना त्यांनी केली. त्यासाठी दिलीप वळसे पाटील आणि जयप्रकाश दांडेगावकर यांची अनुक्रमे राज्य आणि मुंबईच्या संघटनात्मक निवडणुकांकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे दोन निवडणूक निर्णय अधिकारी राज्य आणि मुंबईतील संघटनात्मक निवडणुकांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करतील.
बैठकीला प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या २४ व्या वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम १० जून रोजी नगरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तसेच राज्यभर ठिकठिकाणी वर्धापन दिन साजरा करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.
जयंत पाटलांचा कार्यकाळ पूर्ण
जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. परिणामी नवीन अध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे. तसेच नवाब मलिक यांच्या अटकेनंतर मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद रिक्त आहे. राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. परंतु, अजित पवार यांची पक्षावरील पकड पाहता, त्यांच्या गटातील नेत्यालाच यावेळी संधी मिळेल, असे चित्र आहे. सध्या राजेश टोपे, धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. त्यात राजेश टोपे यांचे पारडे जड मानले जात आहे. आरोग्यमंत्री म्हणून कोरोनाकाळ त्यांनी केलेले काम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. त्यामुळे त्यांना संधी दिल्यास ते सर्वमान्य नेतृत्त्व म्हणून पुढे येऊ शकतात.