प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाज या विषयाच्या पाच-सहा मागण्यांसाठी संभाजी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार संभाजीराजे हे येत्या 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या आणि आमच्या मोजून 5 – 6 असलेल्या मागण्या पूर्ण करा, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारला केले. आत्तापर्यंत मी मराठा समाजासाठी आक्रमक होतो. परंतु, आता उद्विग्न झालो आहे, असे ते म्हणाले.MP Sambhaji Raje’s fast for Maratha reservation at Azad Maidan in Mumbai from 26th February
5 मे 2019 रोजी मराठा आरक्षण रद्द झाले. त्यानंतर सरकारकडे मी अनेकदा मागण्या केल्या. पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली. परंतु ही मागणी देखील विलंबाने पूर्ण करण्यात आली. सध्या सुप्रीम कोर्टात या आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिकेचे स्टेटस काय आहे?, याची आम्हाला माहिती नाही. याखेरीज देखील सरकारकडे मराठा समाजाने पाच-सहा मागण्या केल्या आहेत. परंतु त्याकडे अद्याप दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे उद्विग्न होऊन मी 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहे, असे संभाजीराजे यांनी जाहीर केले आहे. आरक्षण ओबीसी समाजाचा म्हणजे आता कशातूनही द्या पण टिकणारे आरक्षण द्या ही मराठा समाजाची मुख्य मागणी आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मराठा मोर्चा समन्वयकांनी मला टोकाची भूमिका घेऊ नका असा आग्रह धरला. टोकाची भूमिका घेण्याची माझी इच्छा नाही. परंतु राज्य सरकार काहीच हालचाल करत नसल्याचे मला दिसल्याने मी उपोषणाचा निर्णय घेतल्याचे संभाजीराजे म्हणाले.