विशेष प्रतिनिधी
मुंबई : Malegaon Blast मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात ७ मुख्य आरोपींमध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर द्विवेदी यांचा समावेश होता.Malegaon Blast
पीडितांचे वकील शाहिद नवीन अन्सारी म्हणाले- आम्ही एनआयए न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करू. या प्रकरणात तपास संस्था आणि सरकार अपयशी ठरले आहे.Malegaon Blast
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे १०० जण जखमी झाले होते. सुमारे १७ वर्षांनंतर दिलेल्या निकालात न्यायाधीश ए.के. लाहोटी म्हणाले की, तपास यंत्रणा आरोप सिद्ध करू शकलेली नाही, त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा मिळावा.
न्यायाधीश लाहोटी म्हणाले की, स्फोट झाला होता, परंतु मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध झाले नाही. मोटारसायकल साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर होती हे देखील सिद्ध झाले नाही. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब बनवला होता हे देखील सिद्ध झाले नाही.
या प्रकरणाचा निर्णय ८ मे २०२५ रोजी देण्यात येणार होता, परंतु त्यानंतर न्यायालयाने तो ३१ जुलैपर्यंत राखीव ठेवला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र एटीएसने केला होता. २०११ मध्ये हा खटला एनआयएकडे सोपवण्यात आला. एनआयएने २०१६ मध्ये आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात ३ तपास संस्था आणि ४ न्यायाधीश बदलले आहेत.
कोर्ट म्हणाले – दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो, पण दोषसिद्धी केवळ नैतिक आधारावर होऊ शकत नाही
एनआयएच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी निकाल देताना म्हटले की, “आतंकवादाचा कोणताही धर्म नसतो. मात्र केवळ नैतिक आधारावर दोषसिद्धी करता येत नाही.”
अभियोजन पक्ष प्रज्ञा ठाकूर यांच्याशी संबंधित मोटरसायकलचा संबंध सिद्ध करू शकला नाही. ज्या दुचाकीवर कथितरीत्या बॉम्ब ठेवण्यात आला होता, ती प्रज्ञा ठाकूर यांची असल्याचे सिद्ध करण्यात अभियोजन पक्ष अपयशी ठरला. फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून त्या दुचाकीचा चेसिस क्रमांक पूर्णपणे वाचता आला नव्हता, त्यामुळे ती दुचाकी खरोखरच प्रज्ञा ठाकूर यांची होती का, हे सिद्ध होऊ शकले नाही.
प्रज्ञा ठाकूर या संन्यासी झाल्या होत्या आणि स्फोटाच्या दोन वर्षे आधीच त्यांनी सर्व भौतिक संपत्तीचा त्याग केला होता.
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी काश्मीरहून आरडीएक्स मागवले किंवा बॉम्ब तयार केला, याबाबत कोणताही पुरावा सापडला नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. पुरोहित आणि आरोपी अजय राहिरकर यांच्यामध्ये ‘अभिनव भारत’ या संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या नात्याने आर्थिक व्यवहार झाले होते, मात्र पुरोहित यांनी तो पैसा केवळ आपल्या घरासाठी आणि एलआयसी पॉलिसीमध्ये गुंतवला होता, कोणत्याही दहशतवादी कृतीसाठी वापरलेला नाही, असे कोर्टाने म्हटले.
इतर आरोपींसोबत कट रचल्याचा कोणताही ठोस पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही.
‘भगवा दहशतवाद’ हा मतपेटीसाठी रचलेला कट, CM देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने ‘भगवा दहशतवाद’ आणि ‘हिंदू दहशतवाद’ असे चुकीचे चित्र निर्माण करण्याचा कट रचला होता. त्यांनी संपूर्ण मालेगाव खटला त्याच दृष्टिकोनातून तयार केला होता आणि आज तो कट उघड झाला आहे.”
फडणवीस यांनी पुढे म्हटले की, “काँग्रेसने केवळ आपल्या मतपेटीसाठी, विशेषतः एका विशिष्ट धर्माच्या मतपेटीसाठी, हे चित्र लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचे काँग्रेसने जे काम केले, त्याचा आज संपूर्ण देश निषेध करत आहे.”
यावेळी फडणवीस यांनी काँग्रेसने ‘हिंदू दहशतवाद’ आणि ‘भगवा दहशतवाद’ यांसारख्या शब्दांचा वापर केल्याबद्दल देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.
Malegaon Blast: NIA Court Acquits Pragya Thakur & Six Others; Says Accusations Unproven
महत्वाच्या बातम्या
- रामकुंडावर राष्ट्रभावनेची आरती; उद्या 1 ऑगस्टला गोदावरी सेवा समितीच्या आयोजनात सिख परंपरेचे संत, राष्ट्रीय मान्यवर सहभागी
- Saudi Arabia : सौदी अरेबियात परदेशी नागरिकही खरेदी करू शकतील मालमत्ता; तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देश
- Operation Shivshakti : लष्कराचे ऑपरेशन शिवशक्ती, पूंछमध्ये 2 दहशतवादी ठार; तीन शस्त्रे आणि दारूगोळादेखील जप्त
- Bengaluru : बंगळुरूतून 30 वर्षीय शमा परवीनला अटक; गुजरात ATSचा दावा- अल कायदा मॉड्यूलशी संबंध