वृत्तसंस्था
मुंबई – कोरोना लसीच्या तुटवड्याचे कारण देत आज महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे. राज्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन वाढविण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळाने केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, लॉकडाऊन वाढविण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. Maharashtra stopped vaccination in the age group of 18 to 45 years
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातले १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचे लसीकऱण करणे गरजेचे असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात य़ेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आधी पूर्ण करणार आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करु नये. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढविण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळाने केली आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे योग्य वेळी घेऊन जाहीर करतील, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.