विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रात १४४ कलम संचारबंदी – कठोर निर्बंध लावूनही कोरोना फैलावाची स्थिती नियंत्रणात येत नसल्याचे सांगत ठाकरे – पवार सरकारची पावले कडक लॉकडाऊनच्या दिशेने पडताना दिसत आहेत. Maharashtra Lockdown 2021 : Maharashtra heading towards stricter lockdown
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद कोल्हापूर, नागपूरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये करोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी आणि कठोर निर्बंध लावले आहेत. पण तरीही हे निर्बंध कमी पडत असल्याचे राज्याच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
राज्यात १ मे पर्यंत हे निर्बंध राहणार आहेत. मात्र राज्य सरकारने हे निर्बंध लावताना ज्या काही सवलती दिल्या आहेत त्याचा गैरफायदा उठवला जात असल्याचे लक्षात येत आहे. आज संचारबंदीचा पहिला दिवस होता. मात्र, निर्बंध असतानाही सार्वजिनिक ठिकाणी गर्दी कमी होऊ शकली नाही. ही बाब गांभीर्याने घेत ठाकरे – पवार सरकारने पुढची पाऊले टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांना माहिती दिली आहे.
मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती अशा प्रमुख शहरांत तसेच अन्य ठिकाणी आजही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ दिसली. किराणा दुकाने, भाजी मार्केट येथे गर्दी कायम आहे.
मुंबईच्या लोकलमधील गर्दीही कमी झालेली नाही. त्यामुळेच लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा विचार आम्ही करत आहोत, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की यासाठी येत्या दोन दिवसांत कठोर पावले टाकली जातील. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करता येईल. इतर कुणी प्रवास करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
पेट्रोल पंप सुरू राहतील पण अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन उपलब्ध असेल. सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. भाजीपाला आणि किराणा सामानासाठी जी गर्दी होत आहे ती कमी करण्यासाठीही निर्बंध घातले जाऊ शकतात, असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले आहे. निर्बंध कठोरपणे लागू करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देऊन त्यांना तसे अधिकारही प्रदान केले आहेत. त्याचे परिणाम दोन दिवसांमध्ये दिसतील, असे त्यांनी सांगितले.
Maharashtra Lockdown 2021 : Maharashtra heading towards stricter lockdown
इतर बातम्या
- पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या उर्वरित ४ टप्प्यांमध्ये बदल नाही; निवडणूक आयोगाचा खुलासा; कोविड प्रोटोकॉल पाळून प्रचारावर चर्चा
- पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा कायम, बॅकलॉग 45 हजारांवर ; 20 एप्रिलनंतर बाजारात ?
- पश्चिम बंगालमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; कोविड प्रोटोकॉल पाळून प्रचारावर चर्चा