विनायक ढेरे
नाशिक : महाराष्ट्र विधिमंडळ हे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांचे म्हणजे आमदारांचे आहे. पण तिथे चालणाऱ्या परस्पर विरोधी घोषणाबाजीत मात्र चलती मांजरांची आहे!! Maharashtra Legislature is of humans, but it runs on slogans but of cats
… आता हेच पहा ना… शिंदे – फडणवीस सरकारच्या काळातले पावसाळी अधिवेशन “खोके”, “बोके” या शब्दांनी गाजते आहे, तर त्याआधीच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळातले शेवटचे अधिवेशन “म्याऊं – म्याऊं” या आवाजाने गाजले होते. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना माणसांच्या घोषणा देण्यापेक्षा मांजरांच्या घोषणा देऊनच डिवचताना दिसले आहेत.
आदित्य ठाकरे विरोधात म्याऊं म्याऊं
ठाकरे – पवार सरकारच्या काळात आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री होते. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर त्यावेळी भाजपचे सगळे आमदार आंदोलन करत असताना आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून म्याऊं – म्याऊं असा आवाज काढला. आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले आणि ते विधानसभेत निघून गेले. परंतु नंतर मात्र म्याऊं म्याऊं या आवाजामुळे विधिमंडळात जोरदार गदारोळ झाला होता. किंबहुना त्या अधिवेशन म्याऊं म्याऊं या आवाजामुळे गाजले होते.
50 खोके एकदम ओके
आता देखील राज्यात सत्ता परिवर्तन होऊन शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांच्या शिंदे गटाच्या 50 आमदारांच्या संख्येवरून “50 खोके एकदम ओके”, “50 खोके, खाऊन माजलेत बोके”, अशा घोषणा विरोधी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार देताना दिसत आहेत. या घोषणांमध्ये मांजरांची म्याऊं म्याऊं आणि बोके हा कॉमन फॅक्टर आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे जरी वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधली माणसे असली तरी एकमेकांना डिवचताना मात्र त्यांचा “भरोसा” माणसांवर असल्यापेक्षा मांजरांच्या भांडणावर जास्त आहे आणि म्हणूनच ते म्याऊं म्याऊं आणि बोके अशा शब्दांनी एकमेकांना ओरखडत आहेत. बाकी विधिमंडळाचे अधिवेशन नेहमीप्रमाणे जसे पार पडायचे तसे पार पडतेच आहे. आमदारांच्या एकमेकांविरुद्धच्या तक्रारी नेहमीच्याच आहेत!!
Maharashtra Legislature is of humans, but it runs on slogans but of cats
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका आरोग्य सेविकांच्या मानधनात मोठी वाढ!!
- भारत – चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील 500 गावांचे मोदी सरकार करणार पुनर्वसन!!
- बेनामी संपत्तीसाठी ३ वर्षांच्यातुरुंगवासासंबंधीचा कायदा रद्द, पूर्वलक्षी प्रभावाने जप्तीची कारवाई नाही
- काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षी राजकीय कार्यक्रमांपूर्वी सोनिया, राहुल, प्रियांका यांचा एकत्र परदेश दौरा