विशेष प्रतिनिधी
मुंबई : टिपू सुलतानने 75000 हिंदू आणि 33000 नायर यांची हत्या केली हा खरा इतिहास गेल्या 70 वर्षांमध्ये आम्हाला कोणी शिकवला नाही पण म्हणून खरा इतिहास बाहेर यायचा राहिला नाही असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत टिपू सुलतानाच्या समर्थकांचे जबरदस्त वाभाडे काढले. राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला पण टिपू सुलतानचा खरा इतिहास महाराष्ट्राच्या विधानसभेच्या माध्यमातून संपूर्ण देशासमोर आणला. Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
टिपू सुलतान हा चांगला होता की नाही, नंतरची गोष्ट आहे. पण आमचा आक्षेप या गोष्टीवर आहे की, कोणीतरी म्हणतं टिपू सुलतान छत्रपती शिवरायांपेक्षा मोठे राजे होते. छत्रपती शिवरायांइतकं गुणगान टिपू सुलतानाचे केले पाहिजे, असे म्हटले जाते, या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. गेली अनेक वर्षे देशाच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आली. टिपू सुलतानचा आणि आक्रमकांचा अर्धाच इतिहास शिकवण्यात आला
वर्षानुवर्षे आपल्याला हे शिकवण्यात आले की, टिपू सुलतान हे महान राजे होते. पण टिपू सुलतानाने 75000 हजार हिंदू आणि 33000 नायरांची कत्तल केली, हे कधी शिकवण्यात आले नाही. ते इंग्रजांशी का लढले, हे कुणी सांगितलं नाही. टिपू सुलतान स्वत:चं राज्य वाचवायला इंग्रजांशी लढला, हे आपल्याला कधीच सांगण्यात आले नाही.
पण आता खरा इतिहास समोर येत आहे. वर्षानुवर्षे देशात एनसीआरटीच्या पुस्तकात मोघली साम्राज्याला 17 पानं देण्यात आली होती, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी या पुस्तकात एकच परिच्छेद होता. आता मोदी सरकारने एनसीआरटीच्या पुस्तकात मराठ्यांच्या इतिहासाला 20 पानं दिली आहेत. योग्यवेळी नीट इतिहास शिकवला असता, तर आज देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला “हिरो” म्हटले नसते. पण आपण खरा इतिहास कधीच शिकवला नाही. या देशात राष्ट्रभक्त मुसलमान आहेत. मला त्यांच्याविषयी कुठलाही आक्षेप नाही. पण जे लोक देशाच्या विरोधकांना आणि आक्रमकांना “हिरो” मानतील, त्यांना आम्ही सोडणार नाही.
विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित
विरोधी पक्ष हा भ्रमित आणि संभ्रमित आहे, असे दिसते. माझी त्यांना सूचना आहे की, भ्रमात राहून धावण्यापेक्षा संभ्रमातून बाहेर पडण्यासाठी शांतपणे विचार करुन मुद्दे मांडले पाहिजेत. जेणेकरुन महाराष्ट्राच्या हितात तुमचे योगदान वाढेल. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, विकसित भारत, महाराष्ट्राची वाटचाल याबाबत विरोधी पक्षाच्या मनात गल्लत आहे. त्यांनी हा विषय नीट समजून घेतलेला नाही, किंवा त्यांना तो समजलाय पण त्यांना जनतेला संभ्रमित करायचे आहे.
पण आमच्या मनात कुठेही शंका नाही, महाराष्ट्र देशातील पहिली सब नॅशनल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होईल. भारत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल, 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा आताच पार केला आहे. महाराष्ट्र ही देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आपण दरवर्षी 3 लाख 60 हजार कोटींचा जीएसटी जमा करतो. जीएसटीबाबत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आपल्या आसपासही नाही. कृषी निर्यात आणि सेवा क्षेत्रातही महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राने जीडीपीच्या तुलनेत कर्जाच्या गुणोत्तराचे प्रमाणही उत्तम ठेवले आहे.