नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी काल राजधानी नवी दिल्लीत पक्षाच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यामध्ये तब्बल ४ तास त्यांनी वैचारिक चर्चा केली. पवारांनी त्या बैठकीतून भाजप विरोधात वैचारिक लढ्याचा एल्गार पुकारला, नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात दीर्घकाळाची लढाई लढायला तयार राहावे, असा स्फूर्तीदायक संदेश दिला, पण पवारांचा भाजप विरोध लटका असल्याचेच त्यांच्या इतर सगळ्या राजकीय कृतींमधून समोर आले.
एक तर त्यांनी 2022 मध्येच अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठवून दिले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला, तर आकड्यांच्या जुळणीत अजितदादांच्या पक्षाचे आमदार उपयोगी ठरतील. पण दरम्यानच्या काळात भाजपच्या सत्तेच्या वळचळीला राहून या आमदारांचे आर्थिक भरण पोषण होत राहील, हा त्यांचा होरा होता. पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सगळाच होरा चुकला. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत दणकून पराभव झाला. पराभव झाल्यानंतर पवारांनी आपल्या पक्षातल्या उरलेल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना टप्प्याटप्प्याने भाजपमध्ये सोडायला सुरुवात केली. याचे प्रत्यंतर आज निरा नरसिंगपूर मध्ये आले. तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला हर्षवर्धन पाटील पोहोचले. याच हर्षवर्धन पाटलांना पवारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षात घेऊन इंदापुरातून तुतारीचे तिकीट दिले, पण तिथून त्यांना ते निवडून आणू शकले नव्हते.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात चांगला परफॉर्मन्स दाखवून देखील केंद्रात INDI आघाडीची सत्ता आली नाही. त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर पवार आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना काहीच देऊ शकले नाहीत आणि जर आपण नेत्यांना, कार्यकर्त्यांना काहीच देऊ शकत नसू तर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन काही मिळवले, तर कशाला हरकत घ्यायची??, असा विचार पवारांनी केला. उलट भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहुन ते आपल्याच विचारांचे अप्रत्यक्ष भरण पोषण करत राहिले, तर ते हवेच आहे, अशा “पोक्त राजकीय” विचारातून पवारांनी अजित पवारांपासून ते हर्षवर्धन पाटलांपर्यंत वेगवेगळी माणसे भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठवून दिली.
हर्षवर्धन पाटलांनी नीरा नरसिंगपूर मध्ये फडणवीसांचे स्वागत केले. यावेळी पाटलांबरोबर इंदापूर तालुक्यातले त्यांचे कार्यकर्तेही बरोबर होते. फडणवीसांनी नीरा नरसिंगपूर मध्ये कुलदैवत लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन घेतले. लक्ष्मी नरसिंह देवस्थानने त्यांचा सत्कार केला. दुसऱ्यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नीरा नरसिंगपूरला आले म्हणून आपण त्यांचे स्वागत केले. यात कुठलेही राजकारण नव्हते, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले, पण हर्षवर्धन पाटील जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये गेले असले तरी त्यांचे अखिल भारतीय साखर महासंघाचे अध्यक्षपद भाजपने कायम ठेवले. यातून भाजप आणि पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय साटेलोटे असल्याचे उघड झाले.
पण त्या पलीकडे जाऊन शरद पवारांचा भाजप विरोध लटका असल्याची अशी असंख्य उदाहरणे गेल्या वर्षा – दीड वर्षांमध्ये दिसली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला त्यांनी सोनिया गांधी किंवा डाव्या पक्षाच्या कुठल्याही मोठ्या नेत्याला बोलावले नाही, तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संमेलनाच्या उद्घाटनाला निमंत्रण दिले. अर्थातच मोदींचे भाषण तिथे गाजले. पवारांचे भाषण झाल्यानंतर मुलींनी त्यांना पाण्याचा ग्लास भरून दिला त्याच्या बातम्या पवारांच्या भाषणापेक्षा जास्त गाजल्या. प्रत्यक्षात साहित्य विषयक चर्चा या सगळ्या राजकारणात झाकून गेल्या.