नाशिक : harshvardhan patil “पवारांनी अखेर डाव टाकला”, “पवारांची चाणक्य खेळी” वगैरे भाषेत हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाचे वर्णन मराठी माध्यमांनी चालविले आहे. यात “पवारांनी डाव टाकणे” आणि “चाणक्य खेळी करणे” हा कॉमन फॅक्टर आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा दक्षिण महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात पवार गेले की ते “डाव” टाकत असतात आणि “चाणक्य खेळी”च करत असतात, पण “ताटातले वाटीत” याखेरीज त्यामध्ये दुसरे काहीच नसते. Why harshvardhan patil chose wrong pawar option??
हर्षवर्धन पाटलांची केस मात्र याबाबत थोडी वेगळी आहे. राष्ट्रवादी अखंड असो किंवा विभाजित असो, हर्षवर्धन पाटील इंदापुरात तोट्यात!! ही वस्तुस्थिती गेल्या 10 – 15 वर्षांत कधी बदलली नाही. वास्तविक 2014 नंतर हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करून स्वतःची कारकीर्द नव्याने उभारायचा प्रयत्न चालविला होता. भाजपने देखील विशिष्ट मर्यादेत त्यांना साथ दिली होती. त्यांना अगदी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या अध्यक्षपदी नेमून त्यांच्या भाजप प्रवेशाची राजकीय बक्षिसी देखील दिली होती, पण हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय पोपटाचा जीव इंदापूरच्या आमदारकीतच अडकल्याने त्यांनी अखेर महायुतीच्या घोळात शरद पवारांच्या गोटात जायचा निर्णय घेतला.
ज्या शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या घराण्याला म्हणजेच शंकरराव बाजीराव पाटील आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील या काका – पुतण्यांना कायम पाण्यात पाहिले, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळी इंदापूर तालुक्यातून फार डॅमेज होऊ नये म्हणून हर्षवर्धन पाटलांची मदत घेतली, पण प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत त्या मदतीची परतफेड करताना दत्तामामा भरणे यांच्यासारख्या दुसऱ्या कार्यकर्त्याला बळ देऊन हर्षवर्धन पाटलांना पाडले, त्याच शरद पवारांकडे हर्षवर्धन पाटील गेले. ही कदाचित शरद पवारांची “चाणक्य खेळी” म्हणून गणता देखील येईल, पण हे हर्षवर्धन पाटील यांच्या दृष्टीने नेमके कोणते राजकारण घडले??, हा कळीचा सवाल आहे.
वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटलांना वेगवेगळ्या ऑफर देऊनही पाहिल्या होत्या. महायुती टिकावी. अजितदादांच्या पक्षाला सामावून घ्यावे, पण त्याच वेळी अन्य पक्षांमधून आपल्या पक्षांमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना देखील ऍडजेस्ट करावे ही तारेवरची कसरत फडणवीस यांनी करून पाहिली, पण हर्षवर्धन पाटलांनी या तारेवरच्या कसरतीला नकार देत दुसरा कुठलाही “बेटर ऑप्शन” न निवडता ते पवारांच्या गोटात गेले. याचा अर्थ ते वर्षानुवर्षेच्या काँग्रेसची संस्कृतीत वाढले होते, त्यातून ते काहीच शिकले नाहीत, असा काढला तर त्यात फारसे चुकीचे ठरणार नाही.
पवारांना अनंतरावांकडे जावे लागले
वास्तविक शंकरराव बाजीराव पाटलांनी कधीच काँग्रेसची साथ सोडली नव्हती. तशीच इंदापूर पासून जवळच असणाऱ्या भोर मधल्या अनंतराव थोपटे यांची कहाणी आहे. अनंतराव थोपटे यांनी देखील काँग्रेसच्या कुठल्याच चढत्या किंवा उतरत्या काळात पक्षाची साथ सोडली नाही. त्यांनी पवारांशी मर्यादेपेक्षा पुढे जाऊन तडजोड केली नाही. उलट 2024 च्या निवडणुकीत पवारांनाच सुप्रिया सुळे यांच्यासाठी अनंतराव थोपटेंचा उंबरा झिजवावा लागला. वर्षानुवर्षे ज्यांच्याशी राजकीय वैर केले, त्या अनंतरावांच्या घरी पवारांना उतारवयात जावे लागले. सुप्रिया सुळे निवडून याव्यात, त्यासाठी त्यांची साथ मागावी लागली. हा अनंतरावांच्या राजकारणाचा खऱ्या अर्थाने विजय ठरला.
ज्या अनंतरावांच्या मुख्यमंत्री पदात पवारांनी खोडा घातला, त्या अनंतरावांच्या घरी पवारांना जावे लागले, यात पवारांची कुठली “चाणक्य खेळी” नव्हती. उलट त्यांच्या सगळ्या “चाणक्य खेळ्या” फासल्या म्हणून अनंतरावांच्या नाकदूऱ्या काढण्यासाठी त्यांच्या घरी जावे लागले. त्या अनंतराव थोपटे यांच्याकडून थोडे तरी राजकारण हर्षवर्धन पाटील काही शिकले असते, तर ते पवारांच्या गोटात गेले नसते. भाजपमध्येच राहून “लाभार्थी” ठरून अगदी अजितदादांच्या उमेदवाराला परस्पर पाडून इंदापुरातले फासे उलटेपालटे करायला त्यांना फारसा वेळ लागला नसता!!… पण…
Why harshvardhan patil chose wrong pawar option??
महत्वाच्या बातम्या
- ‘…त्यातील एका मागणीची आज पूर्तता झाली’ ; राज ठाकरेंची विशेष प्रतिक्रिया
- Marathi : मोदी सरकारने मराठीला दिला अभिजात भाषेचा दर्जा; पण तो काँग्रेसला मात्र टोचला!!
- Karnataka : कर्नाटकचे आरोग्यमंत्री अडचणीत, सावरकरांचे नातू करणार मानहानीचा दावा
- Siddaramaiahs : सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढल्या; आता MUDA प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा आरोप!