विशेष प्रतिनिधी
मुंबई – सचिन वाझे – अँटिलिया स्फोटके प्रकरण – मनसुख हिरेन हत्या प्रकरण यांच्याविषयी परमवीर सिंग यांनी आज राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे जबाब नोंदविणे आणि मुंबई पोलीसांचा अहवाल आजच महाराष्ट्राच्या गृहखात्याला सोपविणे हा “विलक्षण योगायोग” आज साधला गेला आहे. Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh arrives at the NIA office
परमवीर सिंग हे जबाब नोंदविण्यासाठी सकाळी १०.०० वाजण्यापूर्वीच एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांची जबाब नोंदणी सुरू आहे. ते नेमका काय नोंदवितात… कोणा – कोणाची नावे घेतात याची महाराष्ट्रातल्या बऱ्याच वरिष्ठ नेत्यांना धास्ती आहे.
त्याच दिवशी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे ५ पानांचा अहवाल महाराष्ट्राच्या गृहखात्याकडे सोपवितात. त्यात प्रामुख्याने सचिन वाझेंना सेवेत परत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांच्याच उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, अशा बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत.
आयुक्त हेमंत नगराळे यांनी आपल्या अहवालात असे लिहिले आहे की, सचिन वाझे यांची नेमणूक तत्कालीन पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांच्या तोंडी सूचनांवरून क्राइम इंटेलिजन्स युनिटमध्ये करण्यात आली होती. वाझे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला सारून थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे.
या अहवालात परमवीर सिंग यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. त्याच बरोबर आणखी दोन मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत, ते म्हणजे सचिन वाझे यांना सेवेत घेण्याची शिफारस परमवीर सिंग यांच्याकडे नेमकी कोणी केली होती… आणि परमवीर सिंग यांनी नेमके कोणाचे ऐकले…?? या दोन प्रश्नांची उत्तरे हेमंत नगराळे यांनी गृहखात्याला दिलेल्या ५ पानी अहवालात आहेत का…?? माहिती नाही.
पण परमवीर सिंगांची जबाब नोंदणी आणि त्यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या गृहखात्याला अहवाल हा “विलक्षण योगायोग” मात्र आज साधला गेला आहे.