विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये घेऊन त्याचा अध्यादेश काढू, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण सम्राट मंत्र्यांनी त्याला विरोध करत हा निर्णय हाणून पाडला व सवयीप्रमाणे मुख्यमंत्री यावर सुद्धा मूग गिळून गप्प बसले होते, अशी टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. Fee concession Decision is overturned by Education Emperor Minister : Bhatkhalkar
वीज बिलाच्या बाबतीत सवलत देणार अशी घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याच्या बाबतीत सुद्धा केवळ चालढकल केली आहे. केवळ शासन निर्णय व परिपत्रक काढायचे किंवा शाळांवर कारवाई करण्याचा दिखावा करायचा इतकेच काम ‘शिक्षणसम्राट-धार्जिणे’ महाविकास आघाडी सरकार करत आहे.
कोरोनाच्या सुरुवातीपासून मी स्वतः व भारतीय जनता पार्टीने वारंवार पत्र लिहून, आंदोलन करून व सभागृहात मागणी करून सुद्धा राज्य सरकारने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियम) कायद्यात सुधारणा केली नाही. यासंदर्भात आमची लढाई न्यायालयात सुरू असून न्यायालयाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थी-पालकांना फी मध्ये सवलत मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे अतुल भातखळकर यावेळी म्हणाले.
- शिक्षणसम्राट-धार्जिणे’ महाविकास आघाडी सरकार
- विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचे नुसते आश्वासन
- मंत्रिमंडळात निर्णय घेऊन अध्यादेश : गायकवाड
- शिक्षणसम्राट मंत्र्यांकडून फी सवलतीला हरताळ
- न्यायालयाच्या माध्यमातून विद्यार्थांना न्याय देणार