विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या मशाल गीतातील “हिंदू” आणि “जय भवानी” या शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नोटीस पाठवली आहे. मशाल गीतातील “हिंदू” आणि “जय भवानी” हे दोन शब्द काढावेत अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला. election commission of India asked us to remove two words- ‘Hindu ha tujha dharma’ & ‘Jay Bhavani Jay Shivaji’…I want to tell ECI I will not remove it
मोदी आणि शाह हे जय बजरंग बली आणि राम मंदिर या नावाने निवडणुकीत मतदान मागू शकतात, तर आम्ही “हिंदू” आणि “जय भवानी” घोषणा का द्यायच्या नाहीत??, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करून निवडणूक आयोगाने बजावलेली नोटीस धुडकावली. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानुसार, ‘निवडणूक आयोगाने मशाल गीतामधून “हिंदू” आणि “जय भवानी” हे दोन शब्द काढण्यास सांगितलं आहे. पण, उद्धव ठाकरे यांनी “जय भवानी” हे शब्द गीता मधून काढणार नाही असे आव्हान देत निवडणूक आयोगाशी थेट पंगा घेतला आहे.
आमच्या मशाल चिन्हाच्या गीतामध्ये “जय भवानी, जय शिवाजी” असे एक कडवे आहे. त्यातील “जय भवानी” हा शब्द काढण्याचा फतवा निवडणूक आयोगाकडून काढण्यात आला आहे. पण, आम्ही कोणत्याही परिस्थितीत भवानी हा शब्द काढणार नाही. आमच्यावर कारवाई करणार असाल, तर मोदी – शाह यांच्यावरही तुम्ही कारवाई करणार आहात का?? हे आम्हाला सांगावे. मोदी – शाहांमध्ये महाराष्ट्रातील देवांबाबत इतका द्वेष आहे हे आता कळत आहे, असे ते म्हणाले.
मागे निवडणूक आयोगाकडे तक्रार नाही तर विचारणा केली होती. अटलजी पंतप्रधान असताना बाळासाहेबांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घेतला होता. सहा वर्ष त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. धर्माच्या नावावर भाजप निवडणुका लढवत आहेत. त्यांना सुट देण्यात आली आहे का??
अमित शहा म्हणाले होते, निवडून आल्यानंतर अयोध्येचे दर्शन घडवू. पंतप्रधान मोदी म्हणताहेत बजरंग बलीचे नाव घेऊन बटन दाबा. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती. पण आयोगाने आम्हाला उत्तर दिले नाही. तसा नवा नियम केला असेल तर आम्हीही असा प्रचार केला, तर तुम्हाला आमच्यावर कारवाई करता येणार नाही किंवा तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई केली ते आधी सांगा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले.
आमची निशाणी बदलली आहे. प्रेरणा गीत आहे. प्रेरणेसाठी एक गीत लागतं. मशाल चिन्ह घेऊन एक गीत बनवलं आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही गीत घेऊन गेलो होतो. निवडणूक आयोगाने आम्हाला दोन शब्द काढण्यास सांगितले आहेत. गीतामध्ये ‘हिंदू तुझा धर्म, जाणून घे हे मर्म, जीव त्यास कर तू बहाल’ असे कडवे आहे. यातील “हिंदू” शब्द काढण्यास सांगितले आहे. हिंदू धर्म हा शब्द काढायला लावणे योग्य आहे का??, असा सवाल ठाकरेंनी केला.
आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितले नाही. आम्ही हिंदुत्व सोडले म्हणणाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर द्यावे. बजरंग बली की जय म्हणून बटन दाबा असे म्हटले होते. आम्ही देखील बजरंगबलीचे भक्त आहोत. महाराष्ट्रात आई तुळजा भवानी कुलदैवत आहे. तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आर्शीवाद दिला आहे. जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा लोकांच्या मनामनात आहे. आम्हाला निवडणूक आयोगाला आठवण करुन द्यायचे आहे. उद्या जर आम्ही हर हर महादेव किंवा जय भवानी, जय शिवाजी असे म्हटले तर चालेल का?? आम्ही त्या घोषणा देणारच आहोत. त्यावर निवडणूक आयोगाचा आक्षेप आम्ही मान्य करणार नाही, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत दिले.