नाशिक : “पवार संस्कारित” माणसे मुकाटपणे कापताहेत सत्तेच्या सुमडीत कोंबड्या; “ठाकरे संस्कारित” माणसे काढताहेत एकमेकांच्या चड्ड्या!! हे महाराष्ट्रातल्या राजकारणाचे आजचे चित्र आहे. Pawar politics and Thackeray politics
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार संस्कारित माणसे 360 अंशांचे वळण घेत मुकाटपणे भाजपच्या सत्तेपुढे शरणागती पत्करत सत्तेच्या वळचणीला जाऊन बसली. आपली जुनी “काँग्रेसी संस्कृती” ते शांतपणे विसरले. “काँग्रेसी संस्कृती” हा आपला इतिहास आहे, पण “भाजप संस्कृती” हे वर्तमान आणि भविष्य आहे हे त्यांनी ओळखून गेल्या दीड दोन वर्षांमधली वाटचाल केली. बाकी पवारांचा पक्ष फुटला. आमदार अजित पवारांकडे गेले हा “राजकीय भ्रम” आहे. उलट शरद पवारांनी शांतपणे आपल्या माणसांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसू दिले किंबहुना ढकलून दिले हीच यातली अधोरेखित वस्तूस्थिती आहे. भाजपने आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला हे शरद पवार केव्हाच विसरून गेलेत. आपली माणसे सत्तेच्या वळचणीला जाऊन पोहोचली. यातच आपले “संस्कार” यशस्वी झाले हे स्वीकारून ते मोदींबरोबर गुळपीठ करून बसले.
शरद पवारांची ही चाल ओळखून अजितदादांच्या पक्षातले नेते देखील खुद्द पवारांवर कुठलेच अवाक्षर काढत नाहीत. उलट संस्कारी भाषेत त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतात. आपल्या जुन्या पक्षातली किंवा नव्या पक्षातली अंडी पिल्ली बाहेर काढायची नाहीत आणि अंडी पिल्ली बाहेर आली तरी सत्तेची वळचण सोडायची नाही हे शरद पवारांचे “संस्कार” त्यांचे अनुयायी विसरले नाहीत. म्हणूनच “पवार संस्कारित” दोन मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर आले, तरी पवारांच्या तुतारी पक्षातून अजूनही धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर खऱ्या अर्थाने तोफा डागल्या जात नाहीत. कारण शेवटी पवारांचे संस्कार सत्तेच्या वळचणीला जाऊन बसले. ते हाकलून बाहेर काढल्याशिवाय सहजासहजी तिथून दूर होणार नाहीत.
एकीकडे पवार संस्कारितांचे हे चित्र दिसत:असताना दुसरीकडे ठाकरे संस्कारित नेते मात्र एकमेकांच्या चड्ड्या काढण्यात गुंतलेत. भाजप वर तुटून पडण्याऐवजी दोन शिवसेनांचे नेते एकमेकांचीच असलेली – नसलेली अंडी पिल्ली बाहेर काढण्यात मग्न झालेत. एकेका पदासाठी किंवा उमेदवारीसाठी मातोश्रीला मर्सिडीज द्यावी लागते. आपले नेते घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊन सावरकरांचा अपमान सहन केला वगैरे बाता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मारल्या. 50 खोके एकदम ओके, कामाख्या बळी दिलेले रेडे वगैरे भाषा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून झाली. हे सगळे “ठाकरे संस्कारित” राजकारण दोन शिवसेना एकमेकांवरच शेकवायला लागल्या.
वास्तविक सत्तेसाठी पैसा लागतो आणि पैशासाठी सत्ता लागते हे गणित सगळ्याच पक्षांना लागू होते. पवार संस्कारितांच्या पक्षात तर हे जास्त लागू होते. म्हणून तर “पवार संस्कारित” मुकाट्याने कुठल्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसायला मिळते का हे बघत राहतात. ते एकमेकांशी भांडले तरी फक्त सत्तेच्या मलीद्यासाठी भांडतात, पण एकमेकांची कुठली अंडी पिल्ली बाहेर काढण्याच्या फंदात पडत नाहीत. सत्तेचा मलिदा वाटून कसा खावा हे त्यांना चांगले कळते. त्यामुळे वरवर भाषा स्वाभिमानाची, पण आतून कृती सत्तेपुढे शरणागतीची हे “पवार संस्कारित” माणसांचे राजकारण महाराष्ट्रात चालते. त्या उलट ठाकरे संस्कारित माणसे स्वाभिमानाच्या गप्पा खऱ्या मानतात आणि एकमेकांची अंडी पिल्ली बाहेर काढून बसतात. पण कुठल्याच सत्तेपुढे नुसत्या स्वाभिमानाच्या गप्पा मारून चालत नाहीत, तर त्यावर मात करावी लागते हे त्यांना समजत नाही. पवार आणि ठाकरे संस्कारांमधला हा भेद महाराष्ट्राच्या राजकारणात आज ठळकपणे समोर आला आहे.