• Download App
    Dhananjay Munde राष्ट्रवादीशी अनावश्यक संग केल्याचा फडणवीस सरकारला पहिला फटका; "पवार संस्कारित" मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा!!

    राष्ट्रवादीशी अनावश्यक संग केल्याचा फडणवीस सरकारला पहिला फटका; “पवार संस्कारित” मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा!!

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसशी अनावश्यक संग केल्याचा पहिला फटका फडणवीस सरकारला बसला. “पवार संस्कारित” मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा घ्यावा लागला. संतोष देशमुख प्रकरणाच्या सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला असता तर फडणवीस सरकारची एवढी बेअब्रू झाली नसती, पण पुरती बेअब्रू झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला.

    संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मीक कराड अडकल्यानंतर धनंजय मुंडे यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा होता किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी राष्ट्रवादी काँग्रेसची हेकडी काढून त्यांना बडतर्फ करायला हवे होते. परंतु महायुती धर्म पाळायच्या नादात धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद पुढे रेटण्यात आले. त्यात ओबीसी + मराठा जातीय अँगल अनावश्यक पणे लावण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मंत्र्यांवर कंट्रोल ठेवतील आणि तेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील असे सुरुवातीला मानण्यात आले पण सत्तेला चिकटून राहण्याचा गुण विकसित केलेल्या राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही आणि अजित पवारांनी तो घेतला नाही.

    या दरम्यानच्या काळात फडणवीस सरकारची अब्रू पणाला लागली होती. फडणवीस सरकार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार यातला गुणात्मक फरक टप्प्याटप्प्याने घटत गेला होता. याच दरम्यानच्या काळात एका संघटनात्मक बैठकीला भाजपचे काही आमदार गैरहजर राहिले होते म्हणून फडणवीस यांनी त्या आमदारांना जाहीर दम भरला होता. त्यांना पक्षाच्या शिस्तीचे धडे दिले होते, पण संतोष देशमुख प्रकरणासारखे सरकारची प्रतिमा हानी करणारे मोठे प्रकरण केवळ राष्ट्रवादीच्या युतीमुळे घडले आणि त्या प्रकरणाचा फटका धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे सरकारला बसला त्यावर फडणवीस यांनी वेळीच कारवाई केली नव्हती. ती कारवाई आज करावी लागली. धनंजय मुंडे यांना राजीनामा द्या असे सांगावे लागले त्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत बैठका घ्याव्या लागल्या. त्या बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, स्वतः धनंजय मुंडे यांना हजर राहावे लागले.

    याच दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातले काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे महाराष्ट्रात आणखी संताप उसळला.‌हे सगळे खरे म्हणजे सुरुवातीपासूनच टाळता आले असते. त्यातून फडणवीस सरकारची प्रतिमा उजळ झाली असती, परंतु राष्ट्रवादीशी संग केला. “पवार संस्कारित” नेत्यांना मंत्री केले त्याचा पहिला फटका देवेंद्र फडणवीस सरकारला बसला. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला पण तोपर्यंत फडणवीस सरकारची बेअब्रू होऊन गेली होती.

    Dhananjay Munde Resigned his cabinet minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!

    MHADA : मुंबईत पावसाळ्यापूर्वी ‘म्हाडा’चा मोठा निर्णय!

    Bakri Eid : बकरी ईदच्या आधी विहिंप, बजरंग दल सतर्क; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!