विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्ष तापून तो आता मनोज जरंगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा वैयक्तिक रूपांतरित झाला असताना महाविकास आघाडीचे नेते फक्त सरकारवर आरोपांच्या तोफा डागत आहेत, पण त्या पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक जाहीर केला आणि त्या पाठोपाठ दीपक केसरकर यांची आंबेडकर – राणे भेटीची डिप्लोमसी सुरू झाली, यातून महायुतीत नेमके चालले काय??, याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे. Devendra fadnavis put formula of mahayuti for loksabha elections, Deepak Kesarkar meet prakash ambedkar and narayan rane
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या दौऱ्याच्या बातम्या अनेक आल्या, पण प्रत्यक्षात त्यांचे दौरे काही घडले नाहीत. माध्यमांमधल्या रोजच्या पत्रकार परिषदांखेरीज महाविकास आघाडीत जागावाटप नावाची कुठलीच गोष्ट प्रत्यक्षात येताना दिसत नाही.
उलट मध्येच मनोज जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत गेला आणि त्या पाठोपाठ आता ओबीसी एल्गार परिषदा भरवून छगन भुजबळांनी ओबीसी म्हणून मराठा आरक्षण द्यायला विरोध केला. त्यामुळे आरक्षण मुद्दा ऐरणीवर आला. ठाकरे – पवारांच्या दौऱ्याच्या बातम्या झाकल्या गेल्या.
पण मराठा आरक्षणाचा मुद्दा पूर्ण तापला असताना देखील सव्वा दोन हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप सह अजित पवार गट आणि शिंदे गटाने बाजी मारली. त्यामुळे महायुतीचा कॉन्फिडन्स वाढला आणि मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असताना देखील राजकीय दृष्ट्या कुठेही बॅकफूट वर न जाता देवेंद्र फडणवीस सामने महायुतीचा लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला जाहीर केला. भाजप 26 जागा लढवेल आणि शिंदे गट अजित पवार गट हे 22 जागांमध्ये वाटप करतील असा ढोबळ फॉर्म्युला फडणवीस यांनी जाहीर केला. तो अंतिम नाही पण त्यावर चर्चा होऊन तो अंतिम केला जाईल. ज्याच्याकडे आधीच्या जागा आहेत, तोच पक्ष त्या जागा लढवेल. एका दुसरे जागेची अदलाबदल होईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर ऍक्टिव्हेट झाले आणि त्यांनी काल प्रकाश आंबेडकरांचे भेट घेतली. त्या पाठोपाठ आज ते नारायण राणेंच्या घरी पोहोचले. प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती आहे आणि नारायण राणे हे दीपक केसरकर यांचे गेल्या 20 वर्षांचे राजकीय वैरी आहेत, तरी देखील दीपक केसरकर यांनी या दोन नेत्यांची भेट घेणे याला शिंदे गटाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.
शिंदे गटाची ही राजकीय पेरणी आहे आणि ती दीपक केसरकर यांच्यासारख्या शांत आणि संयमी नेत्याकडे एकनाथ शिंदेंनी सोपविल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या फुटीच्या वेळी “गुवाहाटी नाट्यात” दीपक केसरकर यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून शांतपणे उत्तम कामगिरी बजावली होती. त्या नाजूक राजकीय काळात केसरकरांनी संयम राखत शिंदे गटाची बाजू लावून धरली होती. आता देखील लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून दीपक केसरकर हे प्रकाश आंबेडकर नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांच्या भेटी घेऊन विशिष्ट राजकीय पेरणी करत आहेत. महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय भेटला असताना देखील ही शांतपणे सुरू असलेली राजकीय पेरणी महायुतीचा राजकीय पाया भक्कम करण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची असू शकते.
महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक असताना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर भेटीगाठींमधून आपला गट राष्ट्रवादीपेक्षा मजबूत करण्याच्या कामाला लागल्याचेही ते चिन्ह आहे.