विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकात एक सुभाषित आहे. लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो. पण मित्रशोक हा हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो, असे त्यामध्ये म्हटले आहे. अजित पवार यांच्या निधनाने हीच वेळ आज माझ्यावर आली आहे. अजितदादांसारखा सच्चा मित्र आणि सहप्रवाशांची अकाली एक्झिट ही केवळ राजकीय हानी नाही. ही आपल्या सर्वांच्या अंत:करणाला वेदना देणारी गोष्ट आहे. काही गोष्टींवर काळ औषध असतो, असे म्हणतात. पण अजितदादांच्या निधनामुळे झालेल्या वेदना कधीही कमी होणाऱ्या नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी कवी पी. सावळाराम यांच्याही जनसेवेचे बांधून कंकण या काव्याचा उल्लेख केला.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांविषयी आपल्या भावना मांडल्या.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
आज बोलणं कुठून सुरु करावं असा प्रश्न मला पडला आहे. एक प्रचंड वादळ मनात आहे. कारण आज सभागृहात शोक प्रस्तावासाठी आपण एकत्र आहोत. कधीच कल्पना केली नव्हती अशाप्रकारच्या शोकप्रस्तावावर व्यक्त व्हावं लागेल. अधिवेशनात कधीही सहज बाजूला नजर गेली की, बाजूला खुर्चीत दादा असायचे. सकाळपासून रात्री कितीही उशीरापर्यंत सभागृह चाललं तरी अजितदादा आपल्या जागेवर बसलेले दिसायचे.
आज दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत ही खंत आहे. खरंतर यावर्षी दादांनी बारावा अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी 13 वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषराव वानखेड़े विक्रमाची बरोबरी केली असती. कदाचित पुढच्या काळात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून त्यांचं कार्य राहिलं असतं. पण अचानकपणे दादा आपल्यातून निघून गेले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्याच जबाबदारी माझ्यावर आली.
कठोर निर्णय घ्यायचे असतील, तर ते घ्यायला कधीही मागेपुढे न पाहणारे अजितदादा होते. पण त्याचवेळी वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेचा भार अर्थसंकल्पावर फार मोठ्याप्रमाणात पडेल याचा पुनर्विचार करा, असं सूचविल्यावर ठामपणे निर्णय घेऊन तो विषय मंत्रिमंडळापुढे आणण्याचा काम करणारे अजितदादा होते. लाडकी बहीण योजना सुरु झाल्यावर अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालणं सुरु केलं, आम्हालाही घालायला लावलं होतं. या सगळ्या गोष्टी आता आठवणींमध्ये आहेत. अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण सभागृह दु:खी आहे. खरंतर अशाप्रकारचा शोकप्रस्ताव मांडणं घटनात्मक जबाबादारी आहे. माझ्यासाठी हा भावनिक प्रसंग आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आपण अनेकदा राजकीय नेत्यांच्या एक्झिट नंतर पोकळी निर्माण झाली असे म्हणतो. पण प्रत्यक्षात ज्येष्ठ नेते जातात तेव्हा कमतरता जाणवते, पण अजितदादांसारखा माणूस जो राजकारणात स्थिरावलाय, ज्याने अनेक क्षेत्र पादाक्रांत केली आहेत, आपलं स्वत:चं अस्तित्व, नेतृत्व निर्माण केले आहे. अशी व्यक्ती आपल्यातून निघून जाते, तेव्हा पोकळी निर्माण होण्याची नेमकी व्याख्या आपल्या लक्षात येते.
Devendra Fadnavis on Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- West Bengal : पश्चिम बंगालमध्ये SIR, प्रत्येक जागेवर सरासरी 19000 नावे हटवली; TMCने म्हटले- सव्वा कोटी बंगाली रांगेत उभे
- शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची 60 वर्षे; सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोशल मीडिया पोस्ट, पण “विलीनीकरण” हा शब्दच नाही त्यात…!!
- Asha Sharma : भारतीय वंशाच्या आशा शर्मा मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या CEO बनल्या; फिल स्पेन्सर यांची जागा घेतील
- ED : ED ने 9 महिन्यांत ₹32000 कोटींची मालमत्ता जप्त केली; हे गृह मंत्रालयाच्या एका वर्षाच्या बजेटएवढे