प्रतिनिधी
परभणी : महाराष्ट्रात कोरोनाचे ५० लाख रूग्ण होऊन गेल्यावर हॉस्पिटलचे दर कमी करण्यात आलेत. या निर्णयाला उशीर झाला आहे, असे टीकास्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारवर सोडले. Devendra fadanavis slams government over private hospitals heavy covid bills
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी अधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, की परभणीतील संसर्ग दर ४० टक्क्यांपर्यंत गेला होता, तो आता १० टक्क्यांपर्यंत येतोय. तो ५ टक्क्यांच्या आत आला पाहिजे. मृत्यूदर सुद्धा अधिक होता. कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. लसीकरण आणि म्युकरमायकोसिसच्या ट्रेसिंगवर सुद्धा भर द्यावा लागेल.
राज्यात ५० लाखांवर रूग्ण होऊन गेल्यानंतर रूग्णालयाचे दर नियंत्रित करण्यात आले. या निर्णयाला विलंब झाला. ग्रामीण भागातील रूग्णांकडून प्रचंड बिलं आकारण्यात आली. हा निर्णय वेळेत झाला असता तर कदाचित अनेक रूग्णांचा पैसा वाचला असता. आता तरी सरकारने यात अधिक लक्ष घालावे, अशी सूचना फडणवीस यांनी केली.
संपूर्ण महाराष्ट्रातच मृत्यूसंख्या लपविण्यात आली आहे. ती पारदर्शीपणे मांडायला हवी होती. कोविड विरूद्धच्या उपाययोजना करण्यासाठी ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. त्याचे ऑडिट व्हायलाच पाहिजे आणि ते आम्ही आमच्या स्तरावर करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.