विशेष प्रतिनिधी
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे आज केळींच्या बागांची पाहणी केली. वादळामुळे संपूर्ण केळीबागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. एकही खोड जिवंत राहिलेले नाही, केळीचे हे 100% नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना विमा काढलाय असे समजून नुकसानीचे पैसे दिले पाहिजेत, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Devendra fadanavis demands compensation for all farmers
ते म्हणाले की उचंदा, मुक्ताईनगर अनेक शेतकर्यांशी संवाद साधला. शेतकर्यांनी दिलेली माहिती तर अतिशय संतापजनक आहे. एकिकडे सरकार मदत करीत नाही आणि दुसरीकडे विमा कंपन्यांकडून शेतकर्यांचा छळ सुरू आहे. पंचनामे करण्यासाठी, साधे अर्ज भरण्यासाठी विमा कंपन्या पैसे मागत आहेत.
माझी विनंती आहे की, विमा कंपन्यांनी सरसकट नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकर्यांपुढे कोणत्याही अडचणी निर्माण करू नयेत. राज्य सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे. ज्यांचा विमा नाही, त्यांनाही मदत दिली पाहिजे. आपल्या सरकारच्या काळात विमा काढला असे समजून मदत देण्यात आली होती.
आपल्या सरकारच्या काळात हरिभाऊ जावळे यांची समिती गठीत करून विम्याचे निकष ठरवून तशा निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे सातत्याने चांगला पैसा शेतकर्यांना मिळाला. नवीन निकषांनी निविदा काढल्याने आता केवळ विमा कंपन्यांना लाभ. जुने निकष तत्काळ लागू केले पाहिजे.