विशेष प्रतिनिधी
हिंगोली: शहरामध्ये घनदाट जंगल निर्मितीला सुरुवात झाली आहे. केवळ सव्वा एकर भूभागावर शास्त्रीय पद्धतीने थोडेथोडके नव्हे तर तब्बल एकवीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
शहराच्या मध्यभागी असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये हे हिरवेगार जंगल उदयास येत आहे. dense forest in Hingoli
मियावाकी वृक्ष लागवड पद्धत म्हणजेच घन-वन प्रकल्प अंतर्गत सिमेंटच्या जंगलामध्ये हे झाडांचे जंगल तयार होत आहे.हिंगोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व सेवानिवृत्त तत्कालीन विभागीय वन अधिकारी कामाजी पवार यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाला सुरुवात झाली.
हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासह कळमनुरी येथील तहसील कार्यालय व हिंगोली तहसील कार्यालय तसेच जिल्हा परिषद इमारतीच्या परिसरात देखील अशा प्रकारचा प्रकल्प राबवला जातोय. या घन-वन प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील वातावरणात नैसर्गिक रित्या टिकाव धरणाऱ्या व लुप्त होत चाललेल्या विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायती व विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात देखील तेथील मागणीनुसार अशा प्रकल्पांची निर्मिती करण्याचा मानस हिंगोलीचे प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक विश्वनाथ टाक यांनी व्यक्त केला आहे.
- सव्वा एकरात २१ हजार झाडांची लागवड
- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवेगार जंगल
- घन-वन प्रकल्पामध्ये दुर्मिळ झाडांचे संगोपन
- प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक विश्वनाथ टाक यांच्या प्रयत्नांना यश