वृत्तसंस्था
नवी दिल्ली – भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकणाऱ्या तौकते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या बरोबरीने भारतीय तटरक्षक दलाच्या ४० टीम्स सज्ज आहेत. त्याचबरोबर मदत आणि बचाव कार्यासाठी तटरक्षक दलाची ७५ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि ३७ बोटी तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने आज दिली आहे. Cyclone Tauktae 75 aircraft of Indian Coast Guard
पश्चिम किनाऱ्यावर खवळलेल्या समुद्रात विविध बंदरांमधून मच्छिमारांच्या ५६०० बोटी गेलेल्या आहेत. ३३५ व्यापारी जहाजे आहेत. त्यापैकी अनेक बोटी किनाऱ्यावर सुरक्षित परतल्या आहेत. तटरक्षक दलाने त्यांच्या सुरक्षित परतण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले आहे. सर्व बोटी सुरक्षित परतेपर्यंत तटरक्षक दल हाय ऍलर्टवर राहणार आहे, असे नौदल प्रवक्त्याने स्पष्ट केले.
तटरक्षक दलाच्या मदत आणि बचाव कार्याच्या ४० तुकड्या बोटी, लाइफ जॅकेट्स आणि सुरक्षा साहित्यासह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यांची हालचाल वेगात व्हावी यासाठी हेलिकॉप्टर्सही त्यांच्या मदतीस तैनात ठेवण्यात आली आहेत. मेडिकल टीम्स आणि अँब्युलन्सची व्यवस्था हाय ऍलर्टवर ठेवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. उत्तर कन्नड जिल्हयात ७६ बोटींचे नुकसान झाले आहे.