मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये… असे आवाहनही केले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जालनामधील अंबड येथे मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याशिवाय काही ठिकाणी आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत पोलीसही मोठ्यासंख्येने जखमी झालेले आहेत. त्यात आता या घटनेला राजकीय वळण दिलं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी आंदोलकांना उद्देशून आवाहन केलं आहे. Chief Minister Eknath Shindes statement I will not rest until the Maratha community gets reservation
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये.”
याचबरोबर ”जालना जिल्ह्यातील आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या आंदोलनाचे नेते जरंगे पाटील यांच्याशी मी संवाद साधला होता. त्यांच्या मागण्यांबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठकाही झाल्या होत्या. त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून कार्यवाही सुरु होती. परंतु, त्यानंतरही आंदोलन सुरू झाले. जरंगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची मी विनंती केली होती. मात्र, त्या दरम्यान आंदोलकांची प्रकृती खालावली. त्यांच्या जीवाची काळजी होती म्हणूनच जिल्हाधिकारी आणि एसपी तिथे गेले. जरंगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल व्हावे अशी विनंती त्यांना केली जात होती. मात्र, त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली.” असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
याशिवाय, ”या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही मी दिले आहेत. तसेच, या घटनेतील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. नागरिकांनी आणि मराठा समाज बांधवांनी शांतता राखावी. माझी मराठा समाजाला आंदोलकांना नम्र विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. मराठा समाजाला मी आवाहन करतो की, त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. हे शासन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे आहे.” असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे.
Chief Minister Eknath Shindes statement I will not rest until the Maratha community gets reservation
महत्वाच्या बातम्या
- एक देश, एक निवडणूक समितीत शहांसह 8 नावे; अधीर रंजन यांनी सहभागी होण्यास नकार
- देशाच्या ओबीसी कोटा धोरणात रोहिणी आयोगाकडून महत्त्वाचे बदल शक्य!!
- उत्तर रेल्वेच्या तब्बल २०७ गाड्या तीन दिवस रद्द, ३६ रेल्वेंच्या मार्गात होणार बदल; G-20 समिटमुळे निर्णय
- ‘वन नेशन-वन इलेक्शन’वर NDAचं पारडं होतयं भारी, YSRCP ने समर्थन करत ‘INDIA’ आघाडीला दिला धक्का!