विशेष प्रतिनिधी
नाशिक : सगळीकडेच तुम्ही कसे??, असे विचारत छगन भुजबळाने मनोज जरांगे पाटील संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांना आरक्षणाच्या नेमक्या आकड्यानिशी आज परखड सवाल केले. Bhujbal’s Jarange, Sambhaji Raje, Ambedkar were challenged with the exact figure of reservation!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक मागासांसाठी 10 % आरक्षण दिले. त्या 10 % मधले 85 % आरक्षण मराठा समाजातलेच लोक घेतात. 60 % वरचे 40% देखील तेच लोक घेतात आणि आता नवीन कुणबी प्रमाणपत्र घेऊन देखील मराठा समाज आरक्षण मागतोय मग बाकीच्यांनी जायचे कुठे??, असा परखड सवाल छगन भुजबळांनी आज इगतपुरीत बोलताना केला.
सर्व समाजाला बरोबर घेऊन दलितांना आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही बसलात. तुम्ही एकाच समाजाच्या बाजूने कसे बोलता??, असा सवाल भुजबळांनी संभाजीराजे यांना केला. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महत्त्वाचे आवाहन केले. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आम्हाला सांगा ना, आम्ही कुठे चुकलोय?? राज्यात काय चाललंय??, त्याच्यावर विचार करा. आम्ही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करत आहोत. दूर ढकलण्याची नाही. किंबहुना या राज्यात जे समजदार आहेत, समाज, वेगवेगळे पक्ष असतील, वेगवेगळ्या पदावर काम करणारे लोक असतील, त्यांना माझी एकच विनंती आहे, त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे. आमचा आक्रोश काय आहे हे समजून घ्यावे. मग आम्हाला सांगावे की आमचे चुकले कुठे??, असा सवाल भुजबळांनी केला.
आम्ही कुणाला नाही म्हणतोय?? पण तुम्ही एकदम सगळेच घेऊन चालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मागासांना 10 % आरक्षण दिले. त्यामध्येही तुम्ही 85 % , 60 % वर 40 % आहेत. त्यामध्ये तुम्हीच. कुणबी प्रमाणपत्र घेऊनसुद्धा तुम्हीच. अरे पण बाकीच्यांनी जायचं कुठे??, असा सवाल छगन भुजबळांनी केला.
तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नाही
तुम्ही समजदार असाल तर सांगा आमच्याकडून काय चुकलं? आम्ही चुकलो तर आम्हाला सांगा. बाकीचे चुकले तर त्यांना सांगा. आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, ते सर्वांना सोबत घेऊन गेले. मला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचे आहे, मला दोन महिन्यांपासून धमकीचे फोन येत आहेत. तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नाही, अशी भूमिका भुजबळांनी मांडली.
गावबंदीचे बोर्ड ताबोडतोब काढून टाका
हे गावबंदी करतात. याला गावात येऊ द्यायचा नाही, त्याला गावात येऊ द्यायचा नाही. प्रत्येकाला येऊ द्या ना गावामध्ये. काही म्हटले तर त्याचे ऐकून घ्या. पटले तर ठीक आहे. त्याला निवडून द्या. नाही पटले, तर नका निवडून देऊ. पण गावातच येऊ देणार नाही, अशी भूमिका कशी चालेल?? दोन-चार टाळकी बोर्ड लावून टाकतात म्हणून मी काल म्हणालो की, अख्खा महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का??, असा सवाल भुजबळांनी केला.
गावबंदीचे बोर्ड ताबोडतोब काढून टाका. संविधानामध्ये 19 वे कलम आहे. या देशात कुणीही कुठेही जाऊ शकतो, फिरू शकतो, आपण त्याला आडकाठी करू शकत नाही. पोलिसांचे काम आहे. पोलीस कधी एक्शन घेणार?? कोणीतरी आमच्यासारखे लोकं जातील, काठीला काठी लागेल, डोके फुटतील, तेव्हा तुम्ही जागे होणार का?? अशी बंदी कोण कुणाला करु शकतो??, असे सवाल भुजबळांनी केले.