वृत्तसंस्था
सांगली :- चांदोली परिसरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत येणाऱ्या उदगिरी पठाराचे सौंदर्य बहरू लागले आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगा, हिरवा गर्द निसर्ग, पांढरे शुभ्र धुके,सोनकी, नीलिमा, मंजिरी ,धनगरी फेटा, सीतेचे अश्रू, स्मिथीया, या यासह अनेक जातींची फुलू लागलेली फुले, वाऱ्याच्या झोतात डुलणारं गवत येथील निसर्गसौंदर्यात भर टाकत आहे. सृष्टीचं हे लावण्या प्रत्येकाच्या मनाला भुरळ टाकत आहे.हा नयनरम्य परिसर मात्र पर्यटकांना माहीतच नसल्यामुळे तो पर्यटकांच्या पासून वंचित आहे.Beautiful plateau of Udgiri Deprived of tourists ..!
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये विस्तारला आहे. या प्रकल्प नजीकच चांदोली परिसरात मात्र शाहूवाडी तालुक्यात येणारं उदगिरी एक धार्मिक स्थळ आहे.पुणे मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात.आरळा (ता. शिराळा) येथून वारणा नदी ओलांडून शाहूवाडी तालुक्यात प्रवेश करता येतो.
येथील शित्तुर मार्गे उदगीरी कडे जाता येते.साधारण 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या धार्मिक स्थळाकडे जाताना डोंगरातून नागमोडी वळणे घेत प्रवास करावा लागतो.सह्याद्रीच्या डोंगररांगातून नागमोडी वळणांचा प्रवास हा अत्यंत सुखद आणि आल्हाददायक आहे.
या मार्गावरून जाताना निसर्गाचं लावण्यं अनुभवता येतं. उदगिरी हे एक धार्मिक स्थळ आहे. जवळपास कुठेही पर्यटन स्थळ नाही. मात्र हा पंधरा किलोमीटरचा प्रवास म्हणजेच एक पर्यटन आहे. या प्रवासा दरम्यानच दक्षिण व उत्तरेला उदगिरी चे पठार विस्तारले आहे. डोंगरात वसलेलं उदगिरी हे दीड ते दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात हे गाव येत असले तरी या गावातील सर्व दैनंदिन व्यवहार सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातच होतात.चांदोली ला येणारा पर्यटक चांदोली धरण ,सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पाहून परत जातो. उदगिरी पठाराचा पर्यटन स्थळांमध्ये समावेश नसल्याने पर्यटकांना तो माहितच नाही. शिवाय डोंगरात उदगिरी हे गाव असल्यामुळे फारसे पर्यटक तिकडे फिरकत नाहीत.
- उदगिरीचे नयनरम्य पठार पर्यटकांपासून वंचित
- चांदोली परिसरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आहे
- कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात आहे
- उदगिरी पठाराचे आता सौंदर्य बहरू लागले
- कास पठाराप्रमाणे उदगिरीवर निसर्गाची उधळण
- उदगिरी हे एक धार्मिक स्थळ सुद्धा आहे
- डोंगरात वसलेलं दीड ते दोन हजार लोकवस्तीचे गाव
- उदगिरीचा पर्यटन स्थळांमध्ये समावेश व्हावा