• Download App
    Baba Adhav सकाळी आणि दुपारी पवार काका - पुतण्या गेले भेटून; बाबांनी उपोषण मागे घेतले ठाकरेंचा मान राखून!!

    Baba Adhav : सकाळी आणि दुपारी पवार काका – पुतण्या गेले भेटून; बाबांनी उपोषण मागे घेतले ठाकरेंचा मान राखून!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सकाळी आणि दुपारी पवार काका – पुतण्या गेले भेटून; बाबांनी उपोषण मागे घेतले ठाकरेंचा मान राखून!! Baba Adhav  Hunger strike end

    – त्याचे झाले असे :

    महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर नुसते EVMs वर खापर फोडून पुढे करायचे काय??, हा प्रश्न उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना भडसावत होताच त्या प्रश्नाची चुटकीसरशी उत्तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी दिले. ते महात्मा फुले वाड्यात जाऊन आत्मक्लेष उपोषणाला बसले. बाबा मूळचे समाजवादी विचारांचे असल्याने त्यांनी राज्यघटना बचाव, लोकांना फुकट काही वाटू नका, संपत्तीचे केंद्रीकरण नको हे मुद्दे त्या उपोषणाला जोडले. मेधा पाटकरांनी बाबांच्या आंदोलनाचे समर्थन केले. अर्थातच महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगेच “नवा उद्योग” मिळाला आणि त्यांच्या आलिशान गाड्या पुण्याच्या महात्मा फुले वाड्याकडे वळल्या.

    – पवार – बाबा भेट

    आज सकाळी शरद पवार बाबा आढावांना भेटून गेले त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीला पूर्ण बहुमत मिळून देखील त्यांनी अजून सरकार स्थापन केले नाही हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय असल्याचे वक्तव्य केले. त्याचबरोबर पवारांनी EVMs हॅक होण्याचे प्रात्यक्षिक आम्हाला तज्ञांनी दाखविले होते, पण आमचा तेव्हा विश्वास बसला नव्हता. पण आता सध्या आमच्या हातात काही पुरावे नसले तरी त्याविषयी संशय असेल, तर त्याची पूर्ण पडताळणी झाली पाहिजे, असे आग्रही मत मांडले. पवारांनी उठाव करायची भाषा वापरून “नवे जरांगे” आंदोलन उभे करायला चिथावणी दिली.

    शरद पवार भेटून जाण्यापूर्वी बाबा आढावांना भेटायला कालच रोहित पवार येऊन गेले होते. त्यावेळी बाबांनी त्यांना एकटी काँग्रेसच अदानी विरोधात बोलते, पण तुम्ही आदानींच्या गाडीमध्ये फिरता, असे सुनावले होते. आता बाबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीने इतके स्पष्ट सुनावल्यानंतर रोहित पवारांना गप्प बसावे लागले. पण काल रोहित पवारांना सुनावलेल्या बाबांनी हा शरद पवारांना देखील अदानी मुद्द्यावर तेच सुनावले का??, याच्या बातम्या मात्र कुठे आल्या नाहीत किंवा बाबांनी आणि शरद पवारांनी अदानी मुद्द्यावर चर्चा तरी केली का??, याच्याही बातम्या कुठे वाचायला मिळाल्या नाहीत.

    अजितदादांनी बाबांसकट सगळ्यांना सुनावले

    शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार बाबांच्या भेटीला आले. त्यांनी बाबा आढाव यांच्यासमोरच महायुतीच्या विजयाचे जोरात समर्थन केले. जनतेने पाचच महिन्यांमध्ये कौल बदलला त्याला आम्ही काय करणार??, त्यांचा कौल मान्य करणे, हे आपल्या सगळ्यांचे काम आहे, असे अजितदादांनी बाबांसकट सगळ्यांना सुनावले.

    त्यांनी बारामतीचे उदाहरण दिले बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांना 85000 लीड मिळायचे आणि मला 50000 लीड मिळायचे, पण मी ही तफावत का, म्हणून विचारायचो नाही. कारण जनतेचा कौल आहे. तो स्वीकारला पाहिजे. नाना पटोले विचारतात, सायंकाळी एकदम मतदान कसे वाढले??, थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी मतदानाचा टक्का कमीच असतो, हे नेहमीच घडते. संध्याकाळी मतदारांनी रांग लावून मतदान केले, हा त्यांचा अधिकाराचा विषय आहे. लोकसभेला महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या त्यावेळेला त्यांनी EVMs बद्दल शंका व्यक्त केली नाही, पण विधानसभेला कौल बदलल्यानंतर विरोधकांनी EVMs शंका व्यक्त केली. याकडे अजितदादांनी बाबांसमोरच लक्ष वेधले.

    – राऊत + अंधारेंसह ठाकरे पोहोचले

    अजितदादा तिथून निघून गेल्यावर उद्धव ठाकरे बाबा आढाव यांच्या उपोषण स्थळी आले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संजय राऊत, सुषमा अंधारे आणि बाकीचे नेते होते. बाबांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रबोधनकार ठाकरे यांच्या आठवणी सांगितल्या. महात्मा फुले आणि त्यांच्यातला समान वैचारिक धागा सांगितला. मुंबई कुणाची??, तर ठाकरेंची!!, असे ते म्हणाले. पण मुंबई हिंदुत्व मानणाऱ्या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती, हे मात्र बाबांनी सांगितले नाही.

    – उपोषण मागे

    या सगळ्या भेटीगाठींमध्ये आघाडीतल्या बुडत्यांना हाती आली काडी आणि सगळे जमले बाबा आढावांच्या दारी!!, हीच वस्तुस्थिती उघड्यावर आली. अखेर उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला मान देत बाबांनी तीन दिवसानंतर उपोषण सोडले. यावेळी त्यांनी गौतम अदानींवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबईच्या जमिनींवर अदानीचा डोळा आहे. पण मुंबई ठाकरेंची आहे. ठाकरेच मुंबई वाचवू शकतील, असे बाबा म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी बाबांना उपोषण मागे घ्यायची विनंती केली. ती मान्य करून बाबांनी तीन दिवसांत उपोषण मागे घेतले.

    Baba Adhav  Hunger strike end

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    संघ शताब्दी : शाखा, संचलन, सेवा आणि संस्कारांच्या पलीकडचे सत्य!!

    संघ शताब्दी : 100 रुपयांच्या नाण्यावर भारत मातेची तसबीर; काँग्रेस + समाजवादी + कम्युनिस्टांच्या fake narrative वर मात!!

    संघ शताब्दी : देशाच्या इतिहासात प्रथमच भारतमातेची तसबीर 100 रुपयांच्या नाण्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अनावरण!!