विशेष प्रतिनिधी
पुणे : एरंडवण्यातील सी डी एस एस कंपनी लगत मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने फेरीवाला क्षेत्र ( Hawker’s zone ) घोषित करण्यात आले होते व याठिकाणी काही स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्यात आले होते. हे करताना त्या अरुंद गल्लीत काय त्रास होईल किंवा वाहतुकीस अडथळा होईल का याचा विचार करण्यात आला नाही असे दिसते, अशी तक्रार करणारे पत्र भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर पुणे महानगर पालिका आयुक्तांना लिहिले आहे. Arbitrary management of the hawker area in PuneSandeep Khardekar’s complaint to Municipal Commissioner
स्थानिक नागरिक 3/4 वर्षांपूर्वीच तक्रार करून दमले. त्यानंतर गेल्या आठवड्यात अचानक मनपा प्रशासनास असे वाटले की येथे फेरीवाला क्षेत्राचा त्रास होतो. अवघ्या दोन दिवसात नोटीसा देऊन येथून स्टॉल पटवर्धन बागेतील साकेत सोसायटी शेजारील मोकळ्या जागेत हलविण्यात आले. समितीचे सदस्य संजय शंके यांनीही याबाबत आक्षेप नोंदविला मात्र सर्व विरोध झुगारून हा निर्णय घाईघाईत घेतल्याचे समोर येत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच राजाराम पूल ते म्हात्रे पूल या प्रचंड रहदारीच्या अपूर्ण रस्त्यावर कोणत्याही प्रकारे फेरीवाला क्षेत्र घोषित करू नये. हा रस्ता वाहतुकीस मोकळा ठेवावा. तसेच फेरीवाला समितीच्या किती बैठका झाल्या आणि बैठकीत कोणते क्षेत्र फेरीवाले क्षेत्र घोषित केले याची यादी जाहीर करावी अशीही मागणी त्यांनी केली.
असे क्षेत्र ठरविताना किंवा तेथे स्थलांतर करताना समितीची बैठक घेऊन निर्णय होतो का याचा तपशील जाहीर करावा व स्थलांतराची चौकशी करावी. अगदी अरुंद गल्लीत पदपथावरील पुनर्वसनामुळे तेथे येणारे ग्राहक व त्यांच्या वाहनांचा नागरिकांना प्रचंड त्रास होतो. मात्र अद्याप पर्यंत बऱ्याच फेरीवाल्यांच्या प्रत्यक्ष पुनर्वसनास सुरुवात झालेली नाही. यात ही सगळा सावळा गोंधळ सुरु आहे.तरी आपण व्यक्तीश: या विषयात लक्ष घालावे व फेरीवाल्यांचे योग्य पुनर्वसन करतानाच शहरातील पादचारी मार्ग पादचाऱ्यांसाठी सुरक्षित राहतील व स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही यापद्धतीने पुनर्वसन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली.