• Download App
    Ajit Pawar NCP अजितदादांच्या पक्षात मोठी "महागाई", ती सावरता येईना तरी सत्तेच्या तुकड्यासाठी घाई घाई!!

    अजितदादांच्या पक्षात मोठी “महागाई”, ती सावरता येईना तरी सत्तेच्या तुकड्यासाठी घाई घाई!!

    नाशिक : अजितदादांच्या पक्षात मोठी “महागाई”; ती सावरता येईना तरी सत्तेच्या तुकड्यासाठी घाई घाई!!, हे शीर्षक सुरुवातीला थोडे विचित्र वाटेल, पण खुद्द अजितदादांच्या वक्तव्याची चिकित्सा केली की त्याचे प्रत्यंतर येऊन ते पटायलाही लागेल. Ajit Pawar NCP

    अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले, ज्याची दखल खुद्द अजितदादांना घ्यावी लागली. तशी माणिकरावांनी आत्तापर्यंत बरीच वादग्रस्त वक्तव्ये केली, पण आत्तापर्यंत अजितदादांनी त्यांची दखल घेतली नव्हती. पण माणिकरावांनी आपल्याला मिळालेले कृषी खाते ही ओसाड गावची पाटीलकी आहे असे वक्तव्य केले, ते अजितदादांना लागले. म्हणून अजितदादांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांचे कान उपटले. आपण बोलताना जपून बोलले पाहिजे. मनातले सगळे सांगितलेच पाहिजे असे नाही. माणिकरावांची वक्तव्य त्यांच्यापेक्षा मलाच जास्त महागात पडतात, असे अजित पवार म्हणाले. अजितदादांनी बऱ्याच दिवसांनी माणिकराव कोकाटे यांच्या रूपात एका सीनियर मंत्र्याला झापले. त्यांची वक्तव्य आपल्याला जास्त महागात पडतात, असे सांगून त्यांना गंभीर इशारा दिला.

    पण अशा स्वरूपाची वक्तव्ये अजितदादांना “महागात’ पडणे ही काही नवीन बाब नव्हे. वास्तविक अजितदादांच्या स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वामध्ये आणि पक्षामध्ये अशी “महागात” पडणारी वक्तव्ये आणि कृती ठासून भरल्यात.

    खुद्द अजितदादांनीच ऐन दुष्काळात आम्ही काय लघुशंका करून धरणे भरू का??, असा सवाल करून दुष्काळग्रस्तांचा अपमान केला होता. राजकीय दृष्ट्या त्यांना तो चांगलाच महागात पडला होता. त्याची कबुली देखील त्यांनी दिली होती. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून त्यांनी प्रायश्चित्त घेतले होते. त्यानंतर बरेच दिवस अजितदादा सौम्य बोलायची प्रॅक्टिस करत होते.

    पण अखंड राष्ट्रवादीत आणि नंतर फुटलेला राष्ट्रवादीत अजितदादांचे हे सौम्यतेचे संस्कार काही रुजू शकले नाहीत. म्हणून त्यांच्या राष्ट्रवादीतून वादग्रस्त वक्तव्यांचे फटाके फुटतच राहिले. अमोल मिटकरी, सुरज चव्हाण यांच्यासारखे बडबोले त्यांनी प्रवक्ते केले. त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून पक्षाला अडचणीत आणले. लोकसभा निवडणुकीत पक्ष गाळात गेला. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सहकार्याने कसाबसा सावरला आणि भाजपने दिलेला सत्तेचा तुकडा गोड मानून खायला लागला.



    पण त्याही पलीकडे जाऊन केवळ वादग्रस्त वक्तव्येच अजितदादांच्या पक्षाला “महागात” पडली असे नाही, तर प्रत्यक्ष राष्ट्रवादीचे संस्कारच अजितदादांना फार “महागात” पडलेत. फक्त ते अजितदादांच्या लक्षात आले नाहीत किंवा ते अजून जाहीर बोलले नाहीत. मुळशीतल्या वैशाली हगवणे प्रकरणात अख्ख्या हगवणे कुटुंबाला अटक झाली. हे हगवणे कुटुंब पवारांच्या “संस्कारांचा अर्क” असल्याचे समोर आले. राजेंद्र हगवणेला अटक झाली, तरी त्याची मस्ती उतरली नाही. कारण हगवणे परिवाराच्या पाठीशी पवारांचेच आशीर्वाद होते. पवारांच्या आशीर्वादानेच हगवणे परिवाराचे सगळे “उद्योग” गेली कित्येक वर्षे सुरू होते. ते आता बाहेर यायला लागलेत. हे आता किती “महागात” पडणारे याचा अंदाज अजून अजितदादांना आलेला दिसत नाही.

    संस्कारांच्या बाता, पण फक्त आर्थिक समृद्धीवर लक्ष

    शरद पवार + सुप्रिया सुळे + अजितदादा यांनी कायम महाराष्ट्रावर पुरोगामी संस्कार केल्याच्या बाता मारल्या, पण प्रत्यक्षात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात आणि घरात पुरोगामीत्वाचे खरे संस्कार ते रुजवू शकले नाही. आर्थिक आणि भौतिक समृद्धीच्या पलीकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्या अनुयायांची दृष्टी कधी गेली नाही. स्वाभिमानाच्या नावाखाली मस्ती हीच राष्ट्रवादीची खरी ओळख राहिली. ती शरद पवार आणि अजित पवार आपल्या कृतीतून पुसू शकले नाहीत. त्यामुळे ती सातत्याने राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीला महागातच पडत राहिली. राष्ट्रवादीला महाराष्ट्रातल्या जनतेने एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कधीही पुढे स्वीकारले नाही. राष्ट्रवादी अखंड असो, वा फुटलेली असो, त्या पक्षाला महाराष्ट्राच्या जनतेने कधी संपूर्ण कौल दिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी कधी काँग्रेसच्या, कधी शिवसेनेच्या आणि आता भाजपच्या सत्तेच्या वळचणीलाच बसणे भाग पडले. याला दुसरे कुठले पक्ष कारणीभूत ठरले नाहीत तर शरद पवारांनी राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या नेत्यांवर केलेले संस्कारच कारणीभूत ठरले. राष्ट्रवादीतली वक्तव्यातली आणि कृतीतली “महागाई” कधी महाराष्ट्राने स्वतःच्या डोक्यावर बसू दिली नाही. ती “पवार संस्कारितांना” सव्याज परत केली.

    अजितदादांना फक्त माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यातली “महागाई” दिसली पण राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या संस्कारांमधली खरी “महागाई” त्यांना अजून दिसू शकली नाही. कारण भौतिक आणि आर्थिक समृद्धीच्या पलीकडे खुद्द अजितदादांनाही दृष्टी नाही. कारण काही झाले तरी ते शेवटी पवारांच्या संस्कारांमध्ये वाढले आहेत ना!!

    Ajit Pawar NCP will have to pay the price for controversial statements and criminal deeds

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    MHADA : मुंबईत पावसाळ्यापूर्वी ‘म्हाडा’चा मोठा निर्णय!

    नरेंदर – सरेंडर, थंडर – ब्लंडर : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले यशस्वी; काँग्रेस – भाजपने मात्र शाब्दिक खेळात अडकवली लढाई!!

    CDS Anil Chauhan : भारताने 48 तासांची लढाई आठ तासांमध्ये संपवली, युद्ध थांबवायची विनंती करणारा फोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला!!