विशेष प्रतिनिधी
मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांशी आपला काहीही संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे. मात्र त्याच वेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांचे 125 तासांचे खरे रेकॉर्डिंग झाले असेल, तर ते कौतुकास्पद आहे, असे उद्गार काढले आहेत. महाराष्ट्रात अशा पद्धतीची यंत्रणा नाही आणि केंद्रीय यंत्रणांच्या हस्तक्षेपाशिवाय असले रेकॉर्डिंग शक्य नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली आहे. Admirable if 125 hours of true recording has been done
महाराष्ट्रातील सरकार तपास यंत्रणांचा वापर करूनही अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच ही टोकाची भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी वकील आणि सरकारवर सनसनाटी आरोप केले. आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ फडणवीस यांनी व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या आरोपांमध्ये शरद पवार यांच्या नावाची ही उल्लेख झाल्याने खळबळ उडाली असताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार म्हणाले, सध्या आरोपांचा काही भाग समजला आहे. पण सरकारी अधिकाऱ्यांची १२५ तासांची रेकॉर्डींग होते ही बाब कौतुकास्पद आहे.
- आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचे नाही का? देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर अनिल गोटे यांचा सवाल
केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय हे अशक्य असल्याचे पवार यांनी सांगितले. अनिल देशमुखांविरोधात ९० छापे टाकण्यात आले. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी केली जाते याचे देशमुख हे उत्तम उदाहरण ठलल्याचे पवार म्हणाले. संबंधित रेकॉर्डिंग मध्ये माझे नाव अप्रत्यक्षपणे घेतले गेले आहे. पण यात आपला काही संबंध नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपने राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील सरकारला कुणीही धक्का लावू शकत नाही. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असला तरी सरकार ५ वर्ष टिकणार असल्याचेही पवार यांनी म्हणाले. रेकॉर्डिंगच्या सत्यतेबाबत पडताळणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
केंद्रीय यंत्रणांशिवाय रेकोर्डिंग अशक्य
125 तास रेकॉर्डिंग हे करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले. ही बाब कौतुकास्पद आहे. १२५ तास रेकॉर्डिंग करायचे म्हणजे ही प्रक्रिया किती दिवस चालली असेल. 125 तास रेकॉर्डिंगचे काम खरं असेल, तर त्यासाठी तशा शक्तीशाली यंत्रणांचा वापर केला असल्याचे दिसून येते. अशा यंत्रणा फक्त भारत सरकारकडे आहे. त्यामुळे राज्यात राज्य सरकारच्या कार्यालयात अनेक तास रेकॉर्डिंग करण्यात यशस्वी झाले. हे खरे आहे का नाही हे सिद्ध झाले पाहिजे, असेही शरद पवार यांनी म्हटले.
मलिकांचा राजीनामा नाहीच
भाजपकडून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर, शरद पवार यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा संबंधच नसल्याचे म्हटले आहे. नवाब मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असून मुस्लिम कार्यकर्त्याचं नाव दाऊदशी जोडायचे हे घृणास्पद असल्याचे ते म्हणाले. दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा व्यवहार करून मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी ईडीने मलिक यांना अटक केली आहे.