विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘तौक्ते चक्रीवादळात बुडून समुद्रतळाशी विसावलेल्या पी- ३०५ बार्जचा नौदलाने शोध घेतला. बार्जच्या आतील भागात एकही मृतदेह मिळाला नाही. आतापर्यंत या दुर्घटनेतील ७० मृतदेह हाती लागले आहेत. 5 peoples still missing in sea
या बार्जवरील पाच व्यक्ती अजूनही बेपत्ता आहेत. या दोनही जहाजांवरील उरलेल्या बेपत्ता व्यक्तींचा शोध लागेपर्यंत नौदलाची हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने आपली शोधमोहीम सुरूच ठेवणार असल्याचे त्यांना सांगितले.
आयएनएस मकरवरील पाणबुड्यांनी समुद्रतळाशी जाऊन बुडालेल्या बार्जची पाहणी केली. हा बार्ज बुडाला तेथे समुद्राची खोली साधारण ३० मीटरच्या आसपास आहे. त्यामुळे नौदलाचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या पाणबुड्यांनी बार्जमध्ये शिरून सर्व खोल्यांमध्येही शोध घेतला; मात्र तेथे त्यांना एकही मृतदेह मिळाला नाही. आता बुडालेली टगबोट वरप्रदाचा समुद्रतळाशी शोध सुरू असून तेथेही पाणबुडे पाठवले जाणार आहेत.
नौदलाच्या परंपरागत इंधनावर चालणाऱ्या पाणबुड्या या समुद्राखाली तीनशे ते चारशे मीटर खोलीपर्यंत जाऊन प्रवास करतात; तर मोठी अणुपाणबुडी साधारण सहाशे मीटरपर्यंत खोल जाते. नौदलाचे विशेष प्रशिक्षण घेतलेले आणि विशेष डायव्हिंग सूट परिधान केलेले पाणबुडे दोनशे मीटरपर्यंत खाली जाऊ शकतात.