वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अक्षय ऊर्जा क्षेत्रातले जागतिक पातळीवरील नेतृत्व भारताकडे आहे. जागतिक हवामान बदलाच्या क्षेत्रात भारत आणि भारतीय कंपन्या पुढाकार घेऊन सकारात्मक काम करीत आहेत. अमेरिकेलेही यातून बरेच धडे शिकता येतील, असे प्रतिपादन अमेरिकन अध्यक्षांचे हवामान बदलाच्या धोरणाचे विशेष प्रतिनिधी जॉन केरी यांनी केले.india’s global leadership has been critical across a range of issues including delivering COVID vaccines
जागतिक हवामान बदलासंदर्भातील भारत – अमेरिका द्विपक्षीय चर्चेसाठी जॉन केरी भारतात आले आहेत. त्यांनी आज पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समवेत शिष्टमंडळ स्तरावरची बातचित केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आज जगाला कोरोना प्रतिबंधक लस पुरवितो आहे.
सौर ऊर्जेतले भारताचे जागतिक स्थान आणि नेतृत्व निर्विवाद आहे. भारत सरकार आणि भारतीय कंपन्या य़ा क्षेत्रात काम करण्यासाठी आघाडीवर आहेत. सौर ऊर्जेचे जागतिक अर्थकारणात स्थान जसे उंचावत जाईल, तसे भारताचेही आर्थिक स्थान जगात उंचावलेले दिसेल, असे जॉन केरी यांनी पत्रकारांना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४५० गिगावॉट अक्षय ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य जे भारतासाठी निश्चित केले आहे, ते जगात विक्रमी आहे. आणि ते २०३० पर्यंत पूर्ण झाले तर जागतिक स्वच्छ ऊर्जा व्यापारात भारत जगात अव्वल देश ठरणार आहे,
याकडेही जॉन केरी यांनी लक्ष वेधले. २०४० पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती आणि साठवणूक क्षेत्रात भारत जागतिक व्यापाराचे नेतृत्व करणारा देश ठरेल, असे इंटरनॅशनल एनर्जी कमिशनच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताला काम करण्यासाठी जी नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे, तो अडव्हांटेज तेवढ्या प्रमाणात अमेरिकेकडे देखील नाही, हे जॉन केरी यांनी स्पष्ट केले.
भारतीय कंपन्यांचा झिरो कार्बन संकल्प
अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारत सरकारच्या पुढाकाराबरोबरच भारताच्या मोठ्या कंपन्यांही सकारात्मक भूमिका बजावत आहेत. अनेक कंपन्यांनी झिरो कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक संकल्पपत्रावर स्वाक्षऱ्या करून त्यादृष्टीने रचनात्मक उपाययोजनाही करण्यास सुरूवात केली आहे, याबद्दल जॉन केरी यांनी समाधान व्यक्त केले.