विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या फैलावाचा सर्वच उत्पादन क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यातही मध्यम – लघू उद्योग, पर्यटन, पशूपालन, नागरी हवाई वाहतूक या क्षेत्रांचे नुकसान खूप मोठे आहे. ते भरून काढण्यासाठी लवकरच पँकेज जाहीर करण्यात येईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. वरील क्षेत्रांशी संबंधित अधिकार्यांची सीतारामन यांनी बैठक घेतली. तीत अधिकार्यांनी नुकसानीचे आढावे सादर केले. त्यावर संभाव्य उपाययोजनाही सूचविल्या. त्याला सीतारामन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोरोना बचाव टास्कफोर्स नेमण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तो लवकरच स्थापन केला जाईल, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले. २२ मार्च ते ३१ मार्च या बंदच्या काळात कर्मचार्यांचे किमान वेतन कापू नये, असे आवाहन मोदींनी केले होते. या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी केलेल्या पँकेजच्या घोषणेला महत्त्व आहे तसेच मंदीच्या काळात देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीनेही त्याला महत्त्व आहे.
कोरोना फैलावाच्या आरोग्य आणि वैद्यकीय परिणामांएवढेच आर्थिक परिणामही गंभीर आहेत, याकडे वित्त सचिवांनी बैठकीत लक्ष वेधले. या आर्थिक दुष्परिणामांवर मात करण्यासाठीच पँकेजचे सूतोवाच सीतारामन यांनी केले. याचा नेमका कालावधी मात्र त्यांनी सांगितला नाही.