- राजनाथ सिंह, अमित शहा, सीतारामन, पियूष गोयल, हरदीप पुरी यांचा समावेश
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी २१ लाख कोटींच्या पँकेजची अंमलबजावणीची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच जणांच्या वरिष्ठ मंत्रिगटावर सोपविली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे या मंत्रिगटाचे नेतृत्व करतील.
करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅकेज जाहीर केले. त्यानंतर सलग पाच दिवस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पॅकेजबद्दल सविस्तर तपशील सादर केले होते. त्यानंतर आता मोदी यांनी या पॅकेजची आणि केलेल्या उपाययोजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी पाच जणांची ही टीम तयार केली आहे.
इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या पॅकेजवर एक अनौपचारिक मंत्रिगट लक्ष ठेवणार आहे. त्याचे नेतृत्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार आहेत. तर या मंत्रिगटात गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांचा समावेश आहे.
अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिदेत त्यांनी एकूण पॅकेज २१ लाख कोटींच्या घरात कसे जाते, याचा ताळेबंदही सादर केला. आता त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच जणांच्या मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. त्यांची लवकरच एक बैठक पार पडणार आहे.