लॉकडाऊनच्या काळात वाधवान बंधुंना महाबळेश्वरला जाण्यासाठी खास परवानगी देणार्या अधिकार्याला केवळ ‘समज’ देऊन कामावर रुजू घेण्यात आले. हे आघाडी सरकार आहे की ‘वाधवान’ सरकार असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात वाधवान बंधुंना महाबळेश्वरला जाण्यासाठी खास परवानगी देणार्या अधिकार्याला केवळ ‘समज’ देऊन कामावर रुजू घेण्यात आले. हे आघाडी सरकार आहे की ‘वाधवान’ सरकार असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
लॉकडाऊनमध्ये जिल्हा बंदी असताना आणि ‘रेड झोन’मधून ‘ग्रीन झोन’मध्ये जाण्यास निर्बंध असतानाही येस बँक, एचडीआयएल घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कपिल आणि धीरज वाधवान बंधूंना महाबळेश्वरला जाण्यासाठी खास परवानगीचे पत्र गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. सरकारने कारवाईचे नाटक करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले.
मात्र, आता सरकारने त्यांना केवळ ‘समज’ दिली असून ते पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. यावरून हे आघाडी सरकार आहे की ‘वाधवान’ सरकार,” असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, मी त्यावेळीही सांगितलं होतं अशा प्रकारचा कोणाताही पास कोणताही अधिकारी आपल्या अधिकारात देऊ शकत नाही. सरकारमधील बड्यांचा आदेश आल्यावरच पास देण्यात आला असणार आहे. आता ज्या गतीनं त्यांना क्लिनचीट देण्यात आली आणि त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आलं यातून सरकारमधल्या किंवा सरकार चालवणार्या प्रमुखांच्या इशार्यावरच वाधवान बंधूंना पास देण्यात आला होता हे स्पष्ट होत आहे.या संपूर्ण घटनेची चौकशी सीबीयाच्या माध्यमातून केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी काही दिवसांपूर्वीच चौकशी अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर केला होता. कोणाच्या शिफारसीने नव्हे केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून वाधवान बंधूंना पत्र दिल्याची कबुली गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर दिली होती. या प्रकरणी गुप्ता यांना समज देण्यात आली असून भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी ताकीदही देण्यात आली. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.