विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे एक वर्ष हे ऐतिहासिक निर्णयांचे ठरले आहे. त्याद्वारे आत्मनिर्भर भारताचा पाया रचला गेला आहे, अशा शब्दात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मोदी सरकार – २ त्या वर्षपूर्तीचे कौतुक केले आहे. तर पंतप्रधान मोदींचे पाठबळ आणि गृहमंत्री अमित शाहांचे यशस्वी संचालनांच्या जोरावर भारत विकासाची घोडदौड करीत असल्याचे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पत्रकारपरिषदेत केले.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीचे कौतुक ट्विटदावेर केले. ते म्हणाले, दुसऱ्या कार्यकाळाचे पहिले वर्ष हे ऐतिहासिक कामगिरीचे ठरले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक चुका सुधारल्या, त्याचसोबतच सहा दशकांच्या दरीस बुजविण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे आत्मनिर्भर भारताचा पाया रचला गेला आहे. मोदींनी सहा वर्षांच्या काळात गरिब कल्याण आणि सुधारणा या समांतररितीने वाटचाल करीत असून ते अतिशय अभुतपूर्व आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रामाणिक नेतृत्वावर जनतेचा मोठा विश्वास असून हे संपूर्ण जगात अतिशय दुर्मिळ चित्र आहे. जनसहभागासवर मोदींचा भर असून त्याद्वारे कोणतेही आव्हान पेलण्याची ताकद निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदींचे दूरदर्शी नेतृत्व आणि कठोर परिश्रम करणारे भाजपचे कोट्यावधी कार्यकर्ते यामुळे देश सदैव अग्रेसर राहणार, यात कोणतीही शंका नाही.
मोदींनी जगभरात भारताचा सन्मान वाढविला- पक्षाध्यक्ष नड्डा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात संपूर्ण जगभरात भारताचा आत्मसन्मान वाढविला असून समर्थ भारताचा प्रभाव संपूर्ण जगभरात निर्माण झाला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे पहिले वर्ष हे वचनपूर्तीचे वर्ष ठरले आहे. पंतप्रधान मोदींचे पाठबळ आणि गृहमंत्री शाहांचे यशस्वी संचालन यामुळे हे शक्य झाले, अस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले.
नड्डा म्हणाले, दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षात जम्मू – काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ अ संपुष्टात आणण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे ‘एक देश, एक विधान, एक प्रधान’ हे स्वप्न साकार झालले. जम्मू – काश्मीरही देशाच्या मुख्य प्रवाहात आले असून लडाखलाही न्याय मिळाला आहे. अयोध्येत भव्य श्रीराममंदिराची उभारणीदेखील मोदींच्याच कार्यकाळात सुरू होणे, हेदेखील विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.
मुस्लिम महिलांना न्याय देणारा तिहेरी तलाकबंदी कायदा, मुस्लिम देशातील हिंदूंसह अन्य अल्पसंख्यांकांना न्याय देणारा सुधारित नागरिकत्व कायदा, दहशतवादविरोधी यूएपीए कायद्याचे बळकटीकरण, एनआयएची कार्यकक्षा वाढविणे, पॉक्सो कायद्यात मृत्यूदंडाची तरतूद आदी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचप्रमाणे आर्थिक आघाडीवरही आगेकूच सुरू असल्याचे नड्डा म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या बळकट नेतृत्वाखाली कोरोना संकटाचा भारत यशस्वीपणे सामना करीत असल्याचे सांगत ते म्हणाले की, जागतिक महासत्तांनी गुडघे टेकले असतानाही भारत कोरोनाचा सामनी प्रभावीपणे करीत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिलेली जनसहभागाची हाक महत्वाची ठरली असून जनसहभागातूनच ही लढाई जिंकली जाणार आहे. वेळीच टाळेबंदी केल्यामुळे जगाच्या तुलनेत भारतात चांगली स्थिती आहे. त्याचप्रमाणे देशातील आरोग्य सुविधांची क्षमता वाढली आहे. आर्थिक संकट लक्षात घेऊन देण्यात आलेले २० लाख कोटींचे पॅकेज हे अर्थव्यवस्थेसाठी अतिशय प्रभावी ठरणार आहे.
सध्या देशात दरदिवशी ४ लाख ५० हजार पीपीई किट्स तयार होत आहेत, दररोज १ लाखापेक्षा जास्त कोरोना चाचण्या होत आहेत, आवश्यक ६० हजार व्हेंटीलेटर्सपैकी ५० हजार देशातच उत्पादित होत आहेत, २ लाख रुग्णशय्या तयार झाल्या असून आयसीयु सुविधा असलेल्या खाटाही लक्षणीय प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीचे पालन करीत जगातील जवळपास १०० देशांना भारताने कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक ती औषधे पुरविली आहेत. मोदींच्या नेतृत्वावर देशवासियांचा विश्वास असल्यानेच हे शक्य झाल्याचेही नड्डा यांनी नमूद केले.