भारताची लाईफलाईन असणारी भारतीय रेल्वे पुन्हा रुळावर येणार असून टप्याटप्याने प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन रेल्वे मंत्रालयाने केले आहे. येत्या 12 मे पासून भारतीय रेल्वे हळूहळू प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताची लाईफलाईन म्हणविली जाणारी भारतीय रेल्वे पुन्हा रुळावर येणार असून टप्याटप्याने प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन रेल्वे मंत्रालयाने केले आहे. येत्या 12 मेपासून भारतीय रेल्वे हळूहळू प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे.
सुरुवातीला 15 मार्गावरील सेवा 30 रिटर्न फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. या रेल्वे स्पेशल रेल्वे म्हणून नवी दिल्ली स्टेशन वरून दिब्रुगड, आगरताळा, हावडा, पटना बिलासपुर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलोर, चेन्नई, तिरुवनन्तपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावी या ठिकाणी सुरू होतील. यानंतर भारतीय रेल्वे आणखी स्पेशल सेवा नवीन मार्गांवर सुरू करेल.
परंतु कोविड-19 सेवा केंद्रे म्हणून राखीव ठेवलेले 20 हजार कोचेस तसेच दर दिवशी 300 गाड्या श्रमिक स्पेशल म्हणून राखीव ठेवल्यानंतर उरलेल्या डब्यांवर आधारित नवीन मार्ग ठरवले जातील.
यासाठीचे आरक्षण 11 मे रोजी दुपारी 4 पासून सुरू होईल आणि ते रेल्वेच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. रेल्वे स्टेशन वरील आरक्षण खिडक्या बंद राहतील आणि तेथून कुठलीही तिकिटे (प्लॅटफॉर्म तिकीटासहित) विकली जाणार नाहीत. केवळ असेच प्रवासी ज्यांच्याकडे वैध कन्फर्म तिकीट आहे त्यांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश दिला जाईल.
प्रवाशांना फेस कवर वापरणे बंधनकारक असेल तसेच गाडी सुटते वेळी त्यांची तपासणी केली जाईल आणि लक्षणें नसलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाईल गाड्यांचे वेळापत्रक आणि इतर तपशील लवकरच जाहीर केला जाईल, असे रेल्वे मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.