काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा टॉप कमांडर रियाज नायकू सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत बुधवारी मारला गेला. मात्र, विदेशी माध्यमांतून त्याच्याबाबत अनेक कथा प्रसुत करून त्याला हिरो ठरविण्याचा प्रयत्न होत आहे. अनंतनाग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप चौधरी यांनी यावर संतप्त होऊन या क्रुरकर्म्याच्या अनेक कहाण्या सांगितल्या आहेत.
वृत्तसंस्था
श्रीनगर : काश्मीरमध्ये एखाद्या दहशतवादी सुरक्षा दलांबरोबर चकमकीत ठार झाला की भारतातील लिबरल्स आणि विदेशी माध्यमांना मानवी अधिकारांची उबळ येते. यामध्ये मग त्या दहशतवाद्याच्या जीवनप्रवासाबाबत अनेक कथा प्रसुत करून त्याला हिरो ठरविण्यात येते. दहशतवादी रियाझ नायकू याच्याबाबतही सध्या असेच घडत आहे. त्यामुळे अनंतनाग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप चौधरी यांनी त्याच क्रुर दहशतवादी कृत्यांच्या अनेक कहाण्या ‘द प्रिंट’ मध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात सांगितल्या आहेत.
रियाज नायकू काश्मीरमध्ये सर्वात जास्त सक्रिय असलेला दहशतवादी होता. तो हिजबुल मुजाहिद्दीनसाठी काम करायचा. त्याच्यावर अनेक पोलिसांचे किडनॅपींग आणि खुनाचा गुन्हे दाखल होते. मात्र, बुरहान वानीप्रमाणेच त्यालाही आता हिरो ठरविले जात आहे. अवघ्या ३५ वर्षांचा आणि गणित विषयाचा शिक्षक असलेल्या रियाझचा दहशतदवादापर्यंत प्रवास कसा झाला याच्या अनेक कहाण्या प्रसुत केल्या जात आहेत.
मात्र, चौधरी यांनी त्याच्या दहशतवादी कृत्यांची मालिकाच मांडली आहे. पुलवामा हल्याचा मास्टरमाइंड असलेल्या रियाझने अनेक निरपराध काश्मीरींनाही लक्ष्य केले होते. फेब्रुवारी महिन्यातच एका तरुणीला ती भारतीय सुरक्षा लष्कराची खबरी असल्याच्या संशयावरून रियाझच्या आदेशाने ठार मारण्यात आले होते. इशरत मुनीर या तरुणीच्या चेहर्यावर एके ४७ रायफलीतून गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्याचा व्हिडीओ बनवूनही दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर टाकला होता.
त्यापूर्वी २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात १९ वर्षाच्या हुझैफ अश्रफ या तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याचा गळा कापतानाचा व्हिडीओ काढण्यात आला होता. अगदी इसीसच्या स्टाईलने तोही सोशल मीडियावर टाकण्यात आला होता.
काश्मीर खोर्यातील दहशतवाद्यांच्या क्रुर कृत्यांची मालिकाच रियाझने सुरू केली होती. संदीप चौधरी म्हणतात, मी शोपिया जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक असताना अनेक निरपराधांच्या हत्या रियाझच्या आदेशाने झालेल्या पाहिल्या आहेत. त्याचे आता एक गणिताचा निष्पाप शिक्षक असे चित्र रंगविले जात आहे. मी हे एवढ्याचसाठी लिहित आहे की या सगळ्या निरपराधांच्या खुन्याचे उदात्तीकरण केले जात आहे.