विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरस कोरोनाचा धोका भारताने वेळीच ओळखून त्यावर परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. त्यामुळे त्याचा फैलाव रोखता आला, अशी प्रशस्ती WHO च्या प्रमुख शास्त्रीय अधिकारी सौम्या स्वामिनाथन यांनी केली.
भारताने ३० जानेवारी पर्यंतच आरोग्य मंत्रालयाच्या सर्व समित्या स्थापन केलेल्या होत्या. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. संशयितांना १४ दिवसांपर्यंत क्वारंटाइन राहण्यास सांगितले होते. त्यातूनही चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जात होते, असे स्वामिनाथन यांनी सांगितले.
भारतात कोरोनाचा प्रवेश युरोपमधून झाला. तो देखील तापमान तपासणी यंत्रातील दोषामुळे. ही यंत्रे दोषास्पद होती. त्यातून कोरोना लक्षणे सुरवातीला ओळखता आली नाहीत. मार्च अखेरपर्यंत युरोपातील पर्यटकांमुळे काही ठिकाणी कोरोनाचा फैलाव झाला होता याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भारतातील कोरोनाचा डाटा विश्वासार्ह आहे. तसाच चीनचा WHO कडे येणारा डाटाही ढोबळमानाने विश्वासार्ह आहे. सर्व देशांकडून येणाऱ्या डाटावर आधारित विश्लेषण केल्यावर जगातील हॉटस्पॉटही ओळखता येतात. प्रचंड गर्दीच्या शहरांमधील धोका यातूनच शोधता येईल, असेही त्यांनी सांगितले.
भारताने योग्य वेळी लॉकडाऊनसारखे उपाय केल्याने कोरोना रोखला गेला पण लॉकडाऊन उघडतानाही योग्य काळजी घेतली पाहिजे अन्यथा त्याचा फैलाव नियंत्रणाबाहेर वाढू शकतो, असा इशाराही स्वामिनाथन यांनी दिला.