चीनी व्हायरसच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र,पुढच्या काळातील आशावादी चित्र रेखाटले आहे. कोरोना संकटात जग चीनकडे तिरस्काराने पाहत आहे. भारताने याला आर्थिक संधीमध्ये बदलून परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र,पुढच्या काळातील आशावादी चित्र रेखाटले आहे. कोरोना संकटात जग चीनकडे तिरस्काराने पाहत आहे. भारताने याला आर्थिक संधीमध्ये बदलून परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.
नितीन गडकरी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला, या वेळी जपानचे उदाहरण देत गडकरी म्हणाले की, आपणही असाच विचार केला पाहिजे आणि त्याकडेही आम्ही लक्ष देखील देऊ. चीनमधून आपला गाशा गुंडाळणाऱ्या कंपन्यांसाठी जापानने आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. त्याचा फायदा भारताने करून घ्यायला हवा.
गडकरी म्हणाले की, परदेशी गुंतवणूकीला चालना देण्यासाठी क्लिअरन्स व इतर सुविधांना गती देण्यात येईल. अर्थ मंत्रालयासह सर्व विभाग आणि आरबीआय कोरोनानंतरची आर्थिक लढाई जिंकण्यासाठी धोरणे आखत आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
यावेळी आपण 100 लाख कोटीची पायाभूत सुविधादेखील तयार करू शकू. चीनी व्हायरसबाबत माहिती चीन जाणूनबुजून लपवून ठेवते हे सिद्ध झाल्यास भारत काही कारवाई करणार का? यावर ते म्हणाले की, ही परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधानांशी संबंधित एक संवेदनशील बाब आहे, त्यामुळे याबाबत मी काही बोलू शकत नाही.