नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने भारतावर तसंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ही टीका भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगच्या वर्मी लागली आहे. आता खड्ड्यात गेला शाहिद आफ्रिदी…. अशी संतप्त प्रतिक्रिया हरभजनने दिली आहे.
शाहिद आफ्रिदी माझ्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही बोलला, ते खूप चुकीचं आहे. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं हरभजनने म्हटलं आहे. शाहिद आफ्रिदी करोनाग्रस्तांसाठी काम करत होता. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने आम्ही शाहिदच्या संस्थेला मदतीचं आवाहन करत होतो. मात्र आता शाहीदचा आणि आमचा कोणताही संबंध नसल्याचं हरभजनने म्हटलं आहे.
मी 20 वर्ष देशासाठी खेळलो आहे. मी भारतात जन्मलो आणि भारतातच अखेरचा श्वास घेईन. आज असो किंवा उद्या. देशाला माझी गरज भासली, तर देशासाठी बंदूक घेऊन सीमेवर जाणारा मी पहिला असेन, असं हरभजने म्हटलं आहे. भारताविरोधात बोलायचा काहीही अधिकार नाही. त्याने त्याच्या देशात आणि मर्यादेत राहावं, असंही तो म्हणाला.
काश्मीरी जनतेचा त्रास समजून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट धर्माचा असण्याची गरज नाही. काश्मीर वाचावायला हवे, असं ट्विट करत शाहिदने भारत सरकारला लक्ष्य केलं होतं तसंच मोदी हे धर्माचे राजकारण करतात. काश्मीरमधील जनतेला आतापर्यंत दिलेल्या त्रासाबद्दल मोदींना उत्तर द्यावं लागेल, असंही शाहिद म्हणाला होता.