Saturday, 10 May 2025
  • Download App
    तब्बल 22 उमेदवार जाहीर करून ठाकरेंनी उभा केला भाजप विरोधात लढा; पण पवार फक्त 5 जागांचा का नाही सोडवू शकत तिढा?? Thackeray brand is bigger than pawar brand in maharashtra

    तब्बल 22 उमेदवार जाहीर करून ठाकरेंनी उभा केला भाजप विरोधात लढा; पण पवार फक्त 5 जागांचा का नाही सोडवू शकत तिढा??

    Thackeray brand is bigger than pawar brand in maharashtra

    महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीमध्ये आपल्या वाटेला आलेल्या सर्व 22 जागांचे उमेदवार जाहीर करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने भाजप विरोधात लढा उभा केला, पण त्या उलट “राष्ट्रीय” नेते असणारे शरद पवार आपल्या वाट्याला आलेल्या 10 जागांपैकी फक्त 5 जागांवरचे उमेदवारच जाहीर करू शकले आणि उरलेल्या 5 जागांचा तिढा पवारांना अद्याप सोडवता आलेला नाही. Thackeray brand is bigger than pawar brand in maharashtra

    महाराष्ट्रात “पवार ब्रँड” पेक्षा “ठाकरे ब्रँडच” मोठा आहे, हे सिद्ध करणारी ही बाब आहे. मग भले पवार ब्रँडची चर्चा मराठी माध्यमांमध्ये कितीही मोठी असो, वस्तुस्थिती हीच आहे की, “पवार ब्रँड” राजकीय कर्तृत्वाच्या दृष्टीने फार छोटा होता आणि आता तर तो जास्तच आकुंचन पावला आहे. 

    त्या उलट उद्धव ठाकरेंनी भाजप विरोधातली घेतलेली कडवी भूमिका, शिवसेनेची संपूर्ण महाराष्ट्रभर बाळासाहेबांनी पसरवून ठेवलेली संघटना या बळावर 22 उमेदवार जाहीर करून दाखवले. ही सोपी गोष्ट नव्हती. संपूर्ण पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे आपल्याबरोबर घेऊन गेल्यानंतर उद्धव ठाकरेंवर ते “घरबशे मुख्यमंत्री” असल्याची टीका जरूर झाली, त्यात तथ्यांश निश्चित होता. पण एकदा सर्वस्व हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे हातपाय गाळून बसले नाहीत, ही पण वस्तुस्थिती त्यांनी जाहीर केलेल्या 22 उमेदवारांच्या नावावरून दिसते.

    ठाकरेंची लोकसभा + विधानसभेची बेगमी

    उद्धव ठाकरेंनी दिलेले 22 उमेदवार हे नगाला नग देण्यासारखे दिलेले दिसत नाहीत. ते मोदींच्या तिसऱ्या लाटेत भाजप सारख्या बलाढ्य पक्षाचा पराभव करू शकतील की नाही??, त्यांची त्या – त्या मतदारसंघात खरी ताकद किती??, हा भाग पहिला, पण त्यांना मिळणारी मते निश्चित दीड लाख ते अडीच लाख या घरात असतील. कारण लोकसभा मतदारसंघांचा साईज आता तेवढा मोठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना दीड ते अडीच लाखांच्या घरात मते मिळणे ही विजयासाठी पुरेशी नाहीत हे निश्चित, पण त्याचबरोबर ती मतं संख्याही थोडी थोडकी नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 4 महिन्यांमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ती खरी बेगमी आहे. विधानसभा निवडणुकीत कुठल्याही उमेदवाराला दीड ते अडीच लाख मते मिळणे हे विजयाच्या भोज्याला शिवण्यासारखेच आहे आणि इथेच उद्धव ठाकरे हे शरद पवारांना भारी ठरले आहेत.



    महाविकास आघाडीत पवारांच्या वाट्याला फक्त 10 जागा आल्या आहेत. एरवी पवारांसारखा “राष्ट्रीय” नेता 10 जागांवरचे उमेदवार चुटकीसरशी जाहीर करून मोकळा झाला असता आणि लोकसभा निवडणुकीत बाहेरच्या राज्यांमध्ये प्रचाराला निघून देखील गेला असता, पण पवारांचा अख्खा पक्ष अजितदादांनी घेऊन गेले. याचा अर्थ पवारांनी तयार केलेले सरदार + दरकदार + मनसबदार अजितदादा आपल्याबरोबर घेऊन गेले. त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने निवडणूक लढवण्याची क्षमता होती. पवारांकडे उरलेल्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार करण्याची क्षमताच उरलेली नाही.

    कारण पवारांच्या पक्षाचे वैशिष्ट्य असे की, पवार त्या – त्या गावांमधले, तालुक्यांमधले “सक्षम” नेते निवडतात आणि त्यांची आपल्या पक्षामध्ये “खोगीरभरती” करतात. स्वतःच्या क्षमतेवर निवडून येऊ शकणाऱ्या नेत्यांची पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. पण नेमकी ही अख्खी पार्टी आज अजितदादांच्या बरोबर आहे आणि इथेच खरी पवारांची गोची झाली आहे. साताऱ्यासारखे उदाहरण पाहिले तर ती गोची लगेच समजून येते.

    श्रीनिवास पाटलांनी केली साताऱ्यात गोची

    शरद पवारांचे निष्ठावंत खासदार श्रीनिवास पाटील हे अजित पवारांकडे गेलेले नाहीत. ते शरद पवारांबरोबरच आहेत, पण त्यांनी वयाच्या आधारे निवडणूक लढवायला नकार दिल्याबरोबर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये “सक्षमपणे” सातारा लोकसभा निवडणूक लढवायला उमेदवाराचा खडखडाट झाला. कारण श्रीनिवास पाटलांसारखा आवाका असणारा नेताच पवारांना साताऱ्यातून तयार करता आला नव्हता. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर हे पवारांचे नेते विधानसभा निवडणुकीपुरते “मर्यादित” आहेत. लोकसभा निवडणूक लढवणे हा त्यांचा घासच नाही. त्यातही शशिकांत शिंदे हे विधानसभा निवडणुकीत पडलेत, तर ते लोकसभा निवडणूक काय लढवणार??, हा सवालच आहे. त्यामुळे पवारांची मर्यादा 2024 च्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने उघडी पडली आहे. पवार ना स्वतःच्या करिष्म्यावर एखादा उमेदवार निवडून आणू शकतात, ना आता त्यांच्याकडे तसेच “सक्षम” उमेदवार उरलेत म्हणूनच पवारांना आपल्या वाट्याला आलेल्या 10 जागांपैकी 5 जागांवरचे उमेदवारच मिळेनासे झाले आहेत.
    पवारांची खरी समस्या “ही” आहे.

    प्रादेशिक मानसिकतेच्या पलीकडे जाऊन कधी खऱ्या अर्थाने कामच उभे केले नाही की, अशी गोची होते. मग भले माध्यमे हाताशी धरून पवारांनी स्वतःची “राष्ट्रीय” प्रतिमा जरूर रंगवली असेल, पण प्रत्यक्षात ती रंगसफेदीच ठरली. उलट पवार जास्तीत जास्त राजकीय दृष्ट्या आकुंचन पावले. ते पश्चिम महाराष्ट्राचेही नेते उरले नाहीत, अशी स्थिती या लोकसभा निवडणुकीने निदान उमेदवार जाहीर करण्याच्या पातळीवर तरी जागा दाखवून दिली आहे.

    माढ्यामध्ये पवारांना अजून रणजीत सिंह निंबाळकर यांना तोडीस तोड उमेदवार सापडला नाही. मोहिते पाटलांचे घराणे हातातले कमळ सोडून पवारांची तुतारी हातात घेण्याची हिंमत दाखवू शकत नाही आणि तशी हिंमत दाखवली, तरी पवारांच्या भरवशावर माढाचे मैदान मारण्याची खात्रीही देता येत नाही. कारण मोहिते पाटील घराणे हे देखील माळशिरस विधानसभा मतदारसंघापुरते “मर्यादित” आहे.

    ज्योती मेटेंना पवारांचा भरोसा मिळेल??

    बीडमध्ये पवारांनी डॉ. ज्योती मेटे यांच्या रूपाने उमेदवारीची चाचपणी केली. त्यांचे पती विनायक मेटे काही काळ शरद पवारांबरोबर जरूर राहिले होते, पण विनायक मेटेंचा नंतरचा सगळा काळ हा देवेंद्र फडणवीस बरोबर गेला. त्यामुळे ज्योती मेटे यांना बीडमधून निवडणुकीस उभ्या राहण्यासाठी पवारांना भेटल्या असतील, तर त्यांचे भविष्य काय असेल?? ज्योती मेटे यांची कुठल्याही चिन्हावर लढायची तयारी आहे, असे त्यांनीच सांगितले आहे. पण पवारांचे तुतारी चिन्ह घेऊन ज्योती मेटे या पंकजा मुंडे यांना बीड सारख्या मुंडेंच्या बालेकिल्ल्यात कितपत आव्हान देऊ शकतील??, हा सवालच आहे. कारण कदाचित पवार ज्योती मेटे यांना तुतारी चिन्ह देतीलही, पण पवारांच्या भरवशावर बीड सारखा प्रचंड विस्ताराचा मतदारसंघ ज्योती मेटे आपल्या आवाक्यात घेऊ शकतील ही शक्यताच फार दुरापास आहे. कारण पवार बारामती सोडून बीडवर कॉन्सन्ट्रेशन करतील आणि ज्योती मेटे यांना खऱ्या अर्थाने आधार देतील ही शक्यता तरी आहे का??, हा कळीचा सवाल आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांनी देखील सावध पवित्रा घेत अजून आपण पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही हे सांगितले आहे.

    एकूणच उद्धव ठाकरेंनी आपल्या वाटाचे 22 उमेदवार जाहीर करून भाजप विरोधात खऱ्या अर्थाने पंगा घेण्याची सिद्धता केली, त्यात ते यशस्वी देखील झाले. त्या उलट “राष्ट्रीय” प्रतिमा असूनही शरद पवार महाराष्ट्रातल्या अवघ्या 5 मतदारसंघांचा तिढा अद्याप सोडवू शकलेले नाहीत. हे पवार नावाच्या ब्रँडच्या राजकीय आकुंचनाचे लक्षण आहे!!

    Thackeray brand is bigger than pawar brand in maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Icon News Hub