तणाव आणि राग यांचं एकमेकांशी खूप जवळचं नातं आहे हे सिद्ध झालंय. ताणतणाव अति झाले, की त्यांची परिणती रागात होते. मुलांच्या गरजा, आवडीनिवडी, प्रतिक्रिया याविषयी आपल्या काही ठराविक कल्पना असतात. त्यांना छेद देणारी परिस्थिती आली, की आपण कुठंतरी कमी पडतोय ही भावना येते आणि त्यामुळंही ताण येतो. आता हेच पाहा ना, सार्वजनिक ठिकाणी मूल रडायला लागलं की काय होतं? Put an end to anger on children
आपण गोरेमोरे होऊन आजूबाजूला बघायला लागतो, सगळी शक्ती एकवटून ते रडणं थांबवायचा प्रयत्न करायला लागतो. काय आई आहे, साधं स्वत:च्या मुलाला शांत करता येत नाही हिला, अशी लोकांच्या मनातली भावना त्यांच्या कटाक्षांमध्ये स्पष्ट उमटलेली दिसते आपल्याला. तो ताण, ती वैफल्याची भावना आपल्याला अस्वस्थ करते. ही अस्वस्थता रागामध्ये कधी रूपांतरीत होते, त्याचा पत्ताही लागत नाही.
वेळ ही गोष्ट फार दुर्मिळ झालीये आधुनिक जगात. वेळेचा अभाव हाही ताण उत्पन्न करतो. त्यामुळे आपण घाईत असतो तेव्हा राग जास्त पटकन येतो. आपल्याला खूपदा जाणवलं असेल, शहरापासून थोडं दूर गेलो की किती निवांत असतात लोक; पण शहरात मात्र साधं रस्त्यावरून चालत असताना कुणी मध्ये-मध्ये आलं, तरी लोक उतावीळ होतात. गाडी चालवताना तीच कथा. सिग्नलचे काही सेकंद असह्य होतात. सांदीकोपऱ्यातून गाड्या पुढे नेण्याचा प्रयत्न करत, कर्णकटू हॉर्न वाजवत तिथं अगदी रणांगण बनतं.
हाच इम्पेशन्स आपण बाहेरून आपल्याबरोबर घरी घेऊन येतो. मग तो दबा धरून बसलेल्या प्राण्यासारखा एखाद्या छोट्याशा ठिणगीनंही रागाच्या स्वरूपात भडकून बाहेर पडतो. पालकांच्या सततच्या रागाला तोंड देतादेता मुलं एक तर दबून तरी जातात किंवा कोडगी तरी होतात. गोष्टी लपवून ठेवायला लागतात. चुकीच्या व्यक्तीकडं ओलावा शोधत फिरतात…
आणि ताण किंवा राग कसा हाताळायचा ते परिस्थितीवरची आईबाबांची प्रतिक्रिया पाहून ठरवतात. आपण जेव्हा आतून शांत, समाधानी असतो, तेव्हा राग येण्याची शक्याता कमी असते. अशा वेळी आपण परिस्थितीवर काही तरी उत्तर शोधायचा प्रयत्न करतो किंवा काही वेळा चक्क हसून सोडूनही देतो.