सुवेंदू अधिकारींना पंतप्रधानांच्या बैठकीत नुसते बोलावले, तर ममता बॅनर्जी खवळल्या. केंद्रावर आरोपांची आगपाखड करून त्यांच्याच राजकीय खेळीला बळी पडल्या. ममतांनी केंद्र सरकारवर सतत आगपाखड करावी, हे मोदी सरकारला हवेच आहे. ममतांच्या अहंकाराचा पारा चढत राहावा आणि एक दिवशी त्याचा स्फोट व्हावा, हा तर मोदी आणि भाजपचा हेतू आहे. भाजपशी फक्त संघर्ष करून ममता त्यांचा पाडाव करू इच्छितात. पण ते शक्य नाही. त्यासाठी संघर्षाबरोबरच मुत्सद्देगिरीही लागते. तिचाच ममतांकडे अभाव असल्याचे कालच्या आणि आजच्या घटनांमधून दिसले. political story behind PM Modi – Mamata Banerjee meeting which couldn`t happend yesturday
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आक्रस्ताळ्या आहेत. एककल्ली आहेत. एकला चालो रे हे त्यांचे धोरण आहे… या बातम्या अजिबात नव्या नाहीत. आणि त्या वारंवार राष्ट्रीय, आंतरराष्ट्री आणि राज्यातल्या मीडियाने दिल्या तरी त्यांना त्याचा काही फरक पडत नाही. पण २०२१ च्या बंगालच्या निवडणूकीतील अभूतपूर्व विजयानंतर ममतांची वर्तणूक काही भलतेच सांगून जाताना दिसते आहे. काही वेगळेच राजकीय इशारे करताना दिसते आहे.
ते इशारे फक्त केंद्राला, मोदींना आणि भाजपसाठीच घातक नाहीत तर ते भारताच्या राज्यघटनेनुसार स्थापन झालेल्या संघराज्य व्यवस्थेलाच नख लावू पाहात असल्याचे राजकीय इशारे आहेत. ममतांच्या स्वाभिमानाचे अहंकारात रूपांतर झाले आहे आणि आता त्या अहंकाराने टोक गाठल्याचे हे लक्षण आहे. कालची पंतप्रधानांबरोबरची मिटिंग टाळणे हे अहंकारी टोकातूनच आले आहे. आणि आता जेव्हा केंद्र सरकारने आपले घटनादत्त अधिकार वापरून राज्याच्या मुख्य सचिवांची बदली केली तेव्हा खवळून जाऊन ममतांनी थेट पत्रकार परिषद घेऊन केंद्रावर आरोपांची सरबत्ती केली आहे.
या आरोपांच्या सरबत्तीत ममतांचा एकीकडे आक्रस्ताळेपणा दिसतोय तर दुसरीकडे राजकीय वैफल्य… बंगालच्या एकूण राजकीय घटनाक्रमाकडे लक्ष दिले भाजप आक्रमक भूमिका घेऊन ममतांना डिवचतो, तर केंद्र सरकार कोठेही आपली घटनात्मक मर्यादा ओलांडताना दिसत नाही. काल बैठकीचे एवढे महाभारत मीडियात रंगले. पण पंतप्रधानांच्या तोंडून किंवा केंद्र सरकारच्या प्रतिनिधींकडून एक वावगा शब्दही बाहेर पडलेला दिसला नाही. दिसली ती फक्त कृती… बंगालच्या मुख्य सचिवांची बदली. आणि इथेच केंद्र सरकारने आपले घटनादत्त अधिकार वापरल्याचे दाखविल्याने ममता भडकल्या.
त्यांची आजच्या पत्रकार परिषदेतली भाषा बारकाईने वाचली तर त्यांच्या आक्रस्ताळ्या वक्तव्यामागचे राजकीय वैफल्य लक्षात येईल. त्या एकीकडे प्रोटोकॉल पाळत नाहीत. वर मोदींचे पाय धरण्याची भाषा करतात तर दुसरीकडे राज्यांना केंद्र सरकार कामच करू देत नाही, असा आरोप करतात. राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, अर्थ सचिव केंद्रासाठी काम करीत असल्याचा दावा करतात. राज्यात त्यांना कामे न देता ते राज्यासाठी कामे कधी करणार असा सवाल करून त्यांच्यावरच शंका व्यक्त करतात. ममता आज केंद्र सरकारवर आरोप करून त्याच्याच जंजाळात अडकल्याच्या दिसल्यात.
ममतांचे भांडण स्थानिक नेत्यांशी आहे. पण त्या राग मोदींवर आणि केंद्र सरकारवर काढत आहेत. पंतप्रधान – मुख्यमंत्री यांच्या बैठकीत भाजप नेते कशाला… असा सवाल करून त्यांनी आपले राजकीय दुखणेच जाहीरपणे बोलून दाखविले. त्यात त्यांनी गुजरातमध्ये विरोधी नेत्याला पंतप्रधानांच्या बैठकीचे निमंत्रण नव्हते, हे सांगितले… आणि नेमके हेच भाजपच्या दुहेरी खेळीचे हे यश आहे. सुवेंदू अधिकारी या ममतांच्याच एकेकाळच्या माणसाला विरोधी पक्षनेतेपदी बसवून भाजपने ममतांना पुरते जेरीस आणल्याचे ते लक्षण आहे. ममतांनी आजच्या पत्रकार परिषदेत त्यांचे नाव न घेता जी आगपाखड केली, त्याने सुवेंदू अधिकारी आणि भाजप नेते दुखावण्यापेक्षा सुखावलेच जास्त असतील. कारण ममतांना उचकवण्यासाठीच तर कालच्या बैठकीत सुवेंदूंना निमंत्रण देण्याची खेळी केंद्र सरकारने खेळली होती. ती साध्य झाल्याचेच आज ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेऊन जाहीररित्या सांगितले.
ममतांच्या तिसऱ्या कारकिर्दीची ही तर सुरूवात आहे. सुवेंदूंच्या विरोधी पक्षनेतेपदाची कारकीर्दही त्याच बरोबर सुरू झाली आहे. त्यांच्या बैठकीतल्या नुसत्या उपस्थितीने ममतांचा तीळपापड झाला आहे. अजून विधिमंडळाची ५ वर्षांची अधिवेशने व्हायची आहेत. हुगळीतून बरेच राजकीय पाणी वाहून जायचे आहे. नबानातल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या, उचलबांगड्या व्हायच्या आहेत. केंद्र सरकारच्या एकाच खेळीने ममता अशा उचकायला लागल्या… किंवा हेलपटायला लागल्या तर कसे व्हायचे…?? !! पुढची ५ वर्षे अजून सरायची आहेत. याची छोटीशी झलकच काल आणि आज मिळाली आहे.