शब्दांच्या सहाय्याने माणसे आपल्या अनुभवांची, ज्ञानाची आणि विचारांची देवाणघेवाण करू शकतात, त्यांची पुढल्या पिढ्यांसाठी नोंद करून ठेऊ शकतात, मागल्या पिढ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करू शकतात. यामुळेच मानवजातीची इतकी प्रगती होऊ शकलेली आहे. आपल्या मनात जे भाव उमटत असतात ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी खाणाखुणा आणि गळ्यातुन निघणाऱ्या आवाजातून पशु आणि पक्षी सुध्दा प्रयात्न करीत असतात. पण वाणीची देणगी फक्त मनुष्यालाच आहे. सुरुवातीला वस्तूचे नाव सुचवणारा शब्द आणि मग घटनांचे वर्णन करणारी वाक्ये, त्यानंतर स्मरणाने सर्वच परत मांडता येणे अशी भाषांची प्रगती संपूर्ण जगभर होत गेली. Memorize what you hear with words
आधी पूर्वींच्या पिढ्यांचे ज्ञान मुखोद्गत करूनच पुढल्या पिढ्यांपर्यंत जात असे. जन्माला येणाऱ्या मुलाच्या कानावर शब्द पडत रहातात ते प्रामुख्याने त्याच्या आईचे. आधी प्रेमाची भावना व्यक्त करणारे आणि नंतर त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करणारे आईचे शब्दच त्याला भाषा शिकवतात म्हणून तो पुढे ती भाषा व्यवहारातही वापरायला लागतो. संभाषण कलेमध्ये बोलणाराला काय बोलायचे आहे, ते कोणाशी बोलायचे आहे आणि ते कसे बोलायचे हे सारेच मुद्दे महत्वाचे आहेत. आपल्याला जे बोलायचे असेल ते समोरच्यांना कळेल अशा शब्दात सांगता येणे गरजेचे आहे. त्यासाठी वाणीची उपासना व्यवस्थित करायला हवी. बोलण्या आधी लक्ष देऊन ऐकण्याची कला आत्मसात करायला हवी. ऐकलेले स्मरणात ठेऊन हवे असेल तेव्हा प्रगट करता येणे संभाषण कलेसाठी पायाभूत कौशल्य आहे. ऐकताना जे कानावर पडत असेल त्याचे चित्रण मनात करता आले तर ते अनुभवासारखेच मनात पक्के बसते आणि प्रगट करणेही सोपे जाते. अनुभव घेताना सुद्धा लक्ष त्या अनुभवावर पूर्ण एकत्रित करून मनात शब्दांकन केल्याने तो अनुभव स्मृतीत कोरला जातो आणि त्या शब्दांच्या सहाय्याने केव्हाही परत जागा करता येतो.