थोर विचारवंत ऑरीस्टाटलनं म्हटलं आहे रागावणं सोपं आहे; पण योग्य व्यक्तीवर, योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात रागावणं, हे मात्र अवघड आहे. ताणतणाव अति झाले, की त्यांची परिणती रागात होते. राग ही एक प्राचीन, मूलभूत भावना आहे. हजारो वर्षांपासून मेंदूमधली सर्किट्स यासाठी तयार झाली आहेत. Intense anger, anger is created in the brain
आदिमानवाला जीवघेण्या संकटांपासून बचाव करण्यासाठी राग फार उपयोगी पडत असे. खरं पहायला गेलं, तर आजच्या दैनंदिन जीवनात तशी काही जिवावरची संकटं नसतात, तरी प्रतिक्रिया मात्र तशीच आणि तितक्या च तीव्रतेची दिली जाते. ऍड्रिनॅलीनसारखी रसायनं स्रवतात. छातीत धडधड व्हायला लागते, स्नायू ताठरतात, हातपाय फुरफुरायला, शिवशिवायला लागतात. मोठ्या मेंदूचा वापर करून, विचार करून बोलण्याऐवजी तोंडातून फटकन शब्द निघतात. ताबडतोब काहीतरी कृती करावी असं वाटतं; पण खरं तर त्या वेळी काहीच न करणं शहाणपणाचं ठरतं. कारण त्यावेळी आपला पुरातन, पशुवत मेंदू जोमात असतो, त्यावर विचारांचं नियंत्रण नसतं. शिवाय राग असतो साथीच्या रोगासारखा. म्हणजे रागानं राग पसरतो, वाढतो. परिस्थितीच्या आगीवर पाणी घालून ती विझवण्याऐवजी त्यात तेल ओतून तो ती अधिकच भडकावतो. दुसऱ्यावर कुरघोडी करणं हा एकमेव उद्देश शिल्लक उरतो.
आपला राग अनाठायी होता हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे रागावर, ताणतणावावर नियंत्रण मिळवणे हे खरे पाहता मेंदूच्या मशागतीसाठी फार अनिवार्य व आवश्यक असे आहे. कारण राग आल्याने मेंदूत अनेक रसायने स्त्रवतात त्याचा एकूणच शारिरीक क्रियांवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी सतत ताण कधीच हिताचा नाही. अर्थात अनेकदा राग येणे आपल्या हाती नसते. ते परिस्थीतीवर अवलंबून असते असे आपण म्हणतो. पण ज्यावेळी परिस्थीती हाताबाहेर जातेय असे वाटते किंवा मनाचा तोल ढासळतोय असे वाटते त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करू नका, शांत रहा. मोठा श्वास घ्या. यातून मेंदूला परिस्थितीचे नीट आकलन होण्याची शक्यता अधिक असते हे लक्षात ठेवा.