देशातील वाढत्या वायू प्रदूषणाचा लोकांच्या आयुर्मानावर देखील विपरीत परिणाम होऊ लागला आहे. अशुद्ध आणि दूषित हवेमुळे उत्तर भारतातील लोकांचे आयुर्मान हे नऊ वर्षांनी तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील लोकांचे आयुर्मान हे २.५ ते २.९ वर्षांनी कमी होऊ शकते अशी धक्कादायक बाब नव्या अहवालातून उघड झाली आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारताचा समावेश होतो. देशातील जवळपास ४० टक्के म्हणजेच ४८ कोटी एवढे लोक हे सर्वाधिक वायू प्रदूषणाला सामोरे जात आहेत. भारतीय उपखंडामध्ये उत्तरेकडे वायू प्रदूषणाचे प्रमाण हे तुलनेने अधिक असल्याचे दिसून आले आहे.Impure air is rapidly reducing the lives of citizens
शिकागो विद्यापीठाने तयार केलेल्या हवा गुणवत्ता आयुर्मान निर्देशांकातून ही बाब उघड झाली आहे. एखाद्या व्यक्तीने शुद्ध हवा घेतल्यानंतर ती साधारणपणे किती काळ जगू शकते? याचा अभ्यास विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने केला होता. भारतीय उपखंडातील प्रदूषणाचे प्रमाण हे युरोप आणि उत्तर अमेरिकेपेक्षा अधिक असल्याने येथील हवा शुद्ध झाली तर लोकांना त्याचा मोठा लाभ मिळू शकेल.
भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमध्ये जगातील एक तृतीयांश एवढ्या लोकसंख्येचे वास्तव्य असून जगातील आघाडीच्या प्रदूषित देशांमध्येही त्यांचा समावेश होतो. येथील प्रदूषणाचे प्रमाण कमी केल्यास व्यक्तीच्या आयुर्मानात किमान ५.६ वर्षांची वाढ होऊ शकते. मागील दहा वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तानातील वाहनांची संख्या जवळपास चौपट झाली असून भारत, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांतील पारंपरिक इंधनापासून ऊर्जा निर्मितीचे प्रमाण देखील तिप्पट झाले आहे. हा बदल साधारणपणे १९९७ ते २०१७ या काळात झाल्याचे दिसून येते.
उत्तर भारतातील प्रदूषणाची पातळी ही २०१९ प्रमाणेच राहिली तर या भागांत राहणाऱ्या लोकांचे आयुर्मान हे साधारणपणे नऊ वर्षांनी कमी होऊ शकते. साधारणपणे २००० नंतर परिस्थितीत झपाट्याने बदल झाल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत प्रदूषण कमी केल्यास भारत, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानातील लोक हे ५.६ वर्षांनी अधिक जगू शकतील.