कुठलाही बिजनेस असो व नोकरी आपल्याला यातून काय मिळणार यावर लक्ष केंद्रित केले कि संपले. तुम्ही तुमचे बेस्ट द्यायला सुरुवात करा पैशांचा ओघ आपोआप तुमच्याकडे वयात येईल. अनेकदा आपण फळावर जास्त लक्ष दिल्यामुळे आपल्या कामाकडे दुर्लक्ष होते आणि आपल्या वस्तूचा दर्जा घसरतो किंवा आपल्या क्लास मधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरतो आणि आपलं फळ सुद्धा आपल्यापासून दूर जाते. Identify your strengths and get to work
आपल्या कामावर लक्ष देऊन ते उत्तम केलं तर ग्राहक आपोआप आपल्या वस्तूकडे खेचला जाईल किंवा विद्यार्थ्यांना क्लास लावण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही. आपण बऱ्याच यशस्वी लोकांच्या गोष्टी ऐकतो किंवा त्यांच्याबद्दल वाचतो. ह्याचा आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी चांगला उपयोग होतो पण त्याचबरोबर आपण कधीकधी त्या लोकांना कॉपी करायचा प्रयत्न करतो.पण आपण कोणालाही कॉपी करायचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्यामध्ये कोणते गुण आहेत हे ओळखणे गरजेचे आहे. असं न करता जर आपण त्यांनी केलं तेच करायचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच अयशस्वी होऊ. ह्या ऐवजी स्वतःमध्ये कोणते गुण आहेत आणि त्यांचा वापर आपण कोणत्या प्रकारे करू शकतो हे ओळखणे सगळ्यात महत्वाचे आहे. घोडा पोहण्याच्या स्पर्धेत किंवा मासा पळण्याच्या स्पर्धेत जसं जिंकू शकत नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या कुणाला तरी जमलं म्हणून विचार न करता त्या गोष्टी केल्या तर आपण त्यात यश नाही मिळवू शकत.
म्हणून स्वतःला ओळखा, स्वतःची बलस्थाने ओळखा आणि कामाला लागा. आता याचं एक उदाहरण बघा, माझ्या परिचयाचे एक शर्माजी आहेत (काल्पनिक नाव). त्यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोबाईल ऍक्सेसरीजचे दुकान, बँक रिकव्हरी एजन्सी, किराणामालाचे दुकान असे तब्बल तीन उद्योग केले. सगळीकडे नुकसान झाल्याने सरतेशेवटी डोक्यावर मोठा कर्जाचा बोजा घेऊन ओला, उबर मध्ये लावण्यासाठी एक कार घेतली. एवढे सगळे सांगण्याचा उद्देश हा कि स्वतःला आणि स्वतःच्या बलस्थानांना ओळखा.