नाती सांभाळताना अनेकदा मुले मोठी झाली की रितेपण येते. अशावेळी काय करावे सुचत नाही. रिकामं घरटं ही अवस्था वाईट असते, केवळ ती सोसणारी व्यक्तीच जाणू शकते. बाकीच्यांना सांगितलं तर ते लोक म्हणतात, सुख बोचतंय त्यामुळे आपणच आपल्या मनस्थितीवर उपचार करणं आवश्यक असतं. मुलांचं करता करता, आपण घरात आई आणि दाईच बनलेले असतो. त्यामुळे काय एखाद्या वेगळ्या कुठल्यातरी क्षेत्रात स्वत:ला गुंतवावे. एखाद्या सहलीला, यात्रेला जावे, आपले मूल आता मोठे झालेय, आपल्यात नाही अन्य कुठे तरी आहे. मुलापासून दूर राहणे, हा पण तो त्याच्या भल्यासाठीच घेतलेला आपला निर्णय आहे. अथवा विद्यार्थ्यांचाच तो निर्णय आहे, हे जाणून नवीन कामात स्वत:ला गुंतवून घ्या. Engage yourself in new work
पटकन या रिकाम्या घरटय़ाच्या भावनेतून बाहेर पडणं सोप नाही. पण, प्रयत्न करा, मैत्रीतून विचार प्रकट करा. मन मोकळं करा. गप्पा मारा. आयुष्य हे अतिगतिमान असल्याने सर्वच गोष्टी प्रत्येकाला आपल्या पदरात पाडून घेणे शक्य नाही. पण म्हणून नाराज होऊ नका, खचून जाऊ नका. प्रत्येक अपयशानंतर नव्या उमेदीने उभे राहा स्वत:च्या पायावर.
एक नवा निर्णय घेऊन आणि त्यासाठी गरज आहे, स्वत: स्वत:ला जाणून घेण्याची. स्वत: स्वत:शी संवाद साधण्याची. हरवू देऊ नकोस, या जगतात तू स्वत:ला.. जाणून घेऊ आपण, स्वत:च्या मनाला! वेळ घालवू नकोस, विचार करण्यात दुस-याचा.. हे मना, ओळखू शकतोस तू स्वत:च्या भावनांना! याबद्दल मानसशास्त्र सांगते, तुमच्या जीवनातील अन्य ओळखीच्या अथवा अन्य कामांची भूमिका यांची यादी करा.
आपल्या वेळेचे नियोजन करा आणि स्वत:ला अन्य कुठल्या तरी कामात गुंतवून घ्या. जसे की, एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करणे, एखादे वेगळे पुस्तक वाचणे, योगासन वर्ग लावणे. एखाद्या संस्थेत अथवा कट्टय़ावर जाणे. एखादी परीक्षा देणे. राहून गेलेल्या बेताखालील डिग्री घेणे. जसे की, कायदाचे शिक्षण अथवा कलेचे शिक्षण घेणे.