एकदा पदवी घेऊन तुम्ही जगाच्या मोठय़ा पसा:यात बाहेर पडलात की, तुम्हाला महाविद्यालयात शिकलेल्या गोष्टींचं महत्त्व पटेल. कारण त्याच टप्प्यावर तुमचं खरं शिक्षण सुरू होतं. ते शिक्षण अनुभवातून मिळतं, आपल्या कामातून मिळतं, सभोवतालच्या जगातून मिळतं. मात्र ते शिकताना, नव्या जगाचा भाग होतानाही हे जग आपल्याला बदलायचं आहे, गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत ही जी इच्छा कॉलेजमधे असताना मनात असते, ती कायम जागी ठेवा. Don’t be shy when making decisions
त्या इच्छेच्या जोरावर जे बदलावंसं वाटतं ते आपल्या कृतीतून बदला. जगाच्या सोयीसाठी बदलू नका. जसे आहात तसेच राहा. सच्चे, उत्साही आणि आपल्या मनासारखं करून पाहण्याचा प्रयत्न करणारे. त्यातून तुम्ही आयुष्यात काय करता याचा प्रवास आता सुरू होईल. तुमच्याकडे ज्ञान आहे, माहिती आहे, तंत्र आहे त्यातून तुम्ही काय घडवणार हे तुमच्यासमोरचं खरं आव्हान आहे. या टप्प्यानंतर तुमच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतील, की आपण जो निर्णय घेतो आहोत तो योग्य की अयोग्य असा पेच पडेल. काही अवघड निर्णय घ्यावेच लागतील. ते निर्णय इतरांसाठी अप्रियही असतील. मात्र जर तुम्हाला ते निर्णय योग्य वाटत असतील तर ते निर्णय घ्या. ते अवघड आहेत, इतरांना अप्रिय आहेत, आपल्याला त्रास होईल असा विचार करून कच खाऊ नका. ही वेळ आपली परीक्षा पाहणारी असते. त्यावेळी कच खाल्ली की त्याचे परिणाम पुढे बराच काळ अनुभवावे लागतात.
त्यामुळे त्यावेळी ठाम राहा, स्वत:च्या योग्य निर्णयावर. तुमच्या निर्णयावर ठाम राहिला की त्याचे परिणाम जे काही होतात त्याला तोंड देण्यासाठी आपले शरीर, मन, बुद्धी तयार होते. बदल घडायचे असतील तर असेच घडतील. आणि ते तुम्हीच घडवू शकता.